शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 18 एप्रिल 2015 (12:56 IST)

शिवसेना वाघ राहिली नाही, मांजर झाली

शिवसेना आता वाघ राहिलेली नाही, तर मांजर झाली आहे अशी बोचरी टीका वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांनी शिवसेना पक्षपक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली आहे. रामदास कदम या व्यक्तीला सीरियस घेण्याची  गरज नाही. हा एकदम बेजबाबदार माणूस आहे. त्याला म्हणावे पुरावे दे आणि मगच आरोप कर, असा प्रतिहल्ला त्यांनी केला आहे.
 
शिवसेनेत आता कोणीही निष्ठावान सैनिक उरले नसल्याचे सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सर्वाचीच निष्ठा संपली आहे, आता केवळ व्यावसायिक शिवसैनिक उरले आहेत असा आरोपही राणे यांनी केला.
 
मुंबई महानगरपालिका हे शिवसेनेचे दुकान असून कामधंदा न करता मनपाच्या टक्केवारीवर जगणारी अनेक कुटुंब शिवसेनेत असल्याचा आरोप राणेंनी केला आहे. वांद्रे पूर्व येथील निवडणुकीतील पराभवानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राणे यांनी सेनेवर टीकास्त्र सोडले. गेल्या 22 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर सेनेची सत्ता आहे, मात्र तरीही नागरिकांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. मुंबई महानगरपालिकेत असणारा भ्रष्टाचार संपूर्ण देशात कुठेही होत नाही. शिवसेना मुंबई आणि ठाणे मनपाच्या जीवावर जगते, असा घणाघातही त्यांनी केला. असे सांगत आगामी महापालिका निवडणुकीत आपण काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
एमआयएमला माघार घेण्यासाठी राणेंनी पाच कोटींची ऑफर दिली होती, या पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलेल्या आरोपलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. कदम हा अतिशय बेजबाबदार माणूस असून पालकमंत्री बनण्याचीही त्यांची लायकी नसल्याचे राणेंनी म्हटले. शिवसेनेत आता कोणीही निष्ठावान सैनिक उरले नसल्याचे सांगत बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर सर्वाचीच निष्ठा संपल्याचा आरोपही राणेंनी केला. तसेच मी   एकवेळ राजकारण सोडेन पण पुन्हा शिवसेनेत जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
वांद्रय़ातील पराभवानंतर राणेंची राजकीय कारकीर्द संपली अशी टीका करणार्‍या सेना नेत्यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले.