मंगळवार, 19 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. तीर्थ-क्षेत्र
Written By वेबदुनिया|

तीर्थक्षेत्र अलाहाबाद

WD
अलाहाबाद हे ऐतिहासिक परंपरा आणि धार्मिक वारसा लाभलेलं पर्यटकांचं एक आकर्षक स्थान मानलं गेलं आहे. भारतातील परम पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे ‘प्रयाग’. अलाहाबाद म्हणजेच प्रयाग. अलाहाबाद या शब्दाचा अर्थ ‘देवाचे शहर’ असा आहे. देवांचे हरवलेले चारही वेद मिळाल्यानंतर ब्रह्माने येथे यज्ञ केले होते. येथे गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. या संगमातील स्नानाचे महत्त्व ऋग्वेदात सांगितले आहे. पुराणात प्रयागला ‘तीर्थराज’ असे म्हटले आहे. अलाहाबाद येथे बारा वर्षातून एकदा महाकुंभ मेळा भरतो. याच शहरात सम्राट अकबराने बांधलेला सर्वात मोठा किल्ला आहे. अलाहाबादचा हा किल्ला त्याच्या बांधणीसाठी कलात्मक रचनेसाठी आजही वाखाणला जातो.

आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या मालकीची ‘आनंदभवन’ ही इमारत येथे आहे. भारतीयांसाठी सर्वात पवित्र शहर म्हणजे वाराणसी. अर्थात काशी हे हिंदूंना सर्वात पूज्य वाटणारे क्षेत्र. श्री काशी विश्वेश्वराची गणना बारा जेतिर्लिगामध्ये होते. गंगेच्या काठावरील वाराणशीत भाविक गर्दी करतात. ते गंगेत आपली पापे धुवून आत्मशुद्धी करण्यासाठी येतात.

WD
काशीला वाराणशी, बनारस, अविमुक्त, रूद्रावास, आनंदकानन अशी अनेक नावे आहेत. हिमालयातून वाहात येणार्‍या गंगेचा आकार काशी येथे धनुष्याकृती होतो. गंगा नदी या क्षेत्रीय संथ वाहते. हिमालयातला अवखळपणा येथे नाही. गया येथे ‘गय’ नावाच्या असुरीने ब्रह्मदेवाच्या यज्ञासाठी आपले शरीर दिले म्हणून या तीर्थाला गया हे नाव प्राप्त झाले. पितृश्रद्धासाठी गया हे क्षेत्र अत्यंत प्रसिद्ध आहे. कारण याच ठिकाणी श्री विष्णूंनी गयासुराला आपल्या पायाखाली चिरडून ठार मारले होते. गयासुराने मरताना जो वर मागितला त्यामुळे या ठिकाणी ज्यांचे अंत्यविधी- पिंडदान होते, त्यांना मुक्ती मिळते असा समज आहे. त्यामुळे अवघ्या भारतातले भाविक येथे आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून पिंडदान करतात. गंगेतील टेकडय़ावर विविध देवांची मंदिरे असून येथे विष्णूच्या पावलावर विष्णुपद मंदिर बांधलेले आहे. गयेला गौतम बुद्धांचे आयास्थान मानले जाते. बोधगया हे स्थान गयेपासून 12 कि.मी. अंतरावर आहे.

बोधगयेला बुद्धाला बोधी (ज्ञान) प्राप्त झाले. बोध गया या स्थानाचे मूळ नाव ‘बोधिमंद’ म्हणजे बोधीवृक्षाभोवतीचा परिसर असे होते. गौतम बुद्धाने त्याच्या जीवन काळात नालंदाला (यात्रेतील शेवटचे स्थान) भेट दिली होती. पर्यटक या स्थानापर्यंत येतात.