शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. प्रजासत्ताक दिन
Written By वेबदुनिया|

भारतीय नेमके कोण आणि काय आहेत?

republic day
भारताच्या बाबतीत वेगवेगळ्या कल्पना आहेत. पण प्रश्न पडतो की भारत आणि भारतीय नेमके कोण आणि काय आहेत?

मी अनेक वर्षांपासून अमेरिकेत आहे आणि या देशाबाबत असे बोलले जाते की तो एखाद्या वितळत्या भांड्यासारखा (मेल्टींग पॉट) आहे. ही संकल्पना पंधराशे वर्षांपूर्वी असती तर भारताला ती अधिक लागू पडली असती. कारण सगळ्या जगभरातील लोक भारतात आले होते. ते येथेच राहिले आणि येथे सर्व प्रकारच्या लोकांचे एक अभिसरण झाले. या समरसतेचेच आपण प्रतिनिधी आहोत.

अमेरिका हे आज वितळते भांडे असेल तर भारत जेवणाचे ताट आहे. कारण या ताटात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रादेशिक वाट्या ठेवल्या आहेत. या वाट्यात विविध पदार्थ आहेत. या पदार्थांचे एकूण मिळून जे काही मिश्रण आहे, ती भारतीय संस्कृती आहे.

काही लोक म्हणतात, की भारतात जन्माला आलेला तोच भारतीय. कारण त्याच्या ह्रदय आणि आत्म्याला भारतात आकार मिळाला आहे. असे असेल तर मग भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या आणि इंग्लंडमध्ये जन्मलेल्या एनी बेझंट भारतीय नव्हत्या? मक्केमध्ये जन्माला आलेले मौलाना अब्दूल कलाम आझाद भारतीय नव्हते? असे असेल तर मग सोनिया गांधी भारतीय का नाहीत?

वैविध्य आणि वादांचा देश
विस्टन चर्चिल यांनी एकदा म्हटले होते, की भारत एक केवळ भौगोलिक अभिव्यक्ती आहे. त्याचवेळी भारत हा केवळ एक देश नाही, असेही ते म्हटले होते. वास्तविक चर्चिल यांचे भारताविषयीचे मत कधीच चांगले नव्हते. पण इथे त्यांचे म्हणणे खरे आहे. भारत खरोखरच एक असामान्य देश आहे आणि भारताइतकी विविधता आणि वाद एकात एक गुंफलेला दुसरा देशही या जगात नसेल. या देशात भौगोलिक विविधता आहे, स्थानिक वैविध्य, स्थितीतील वैविध्य, हवामानाचे वैविध्य, भाषा, संस्कृती, भोजन या सार्‍यांत वैविध्य आहे. हे सगळे एका देशात गुंफले आहे. आजही राष्ट्रीय पातळीवर झालेल्या आंदोलनांतून विरोधाभास असूनही भारत महान आहे, हेच अधोरेखित झाले आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या बाबतीत म्हटले होते, की भारत एक मिथक आहे. एक विचार आहे. हा स्वप्न आणि विशिष्ट दृष्टिकोन असणारा देश आहे. आमच्या देशात बर्फाची चादर असलेली शिखरे आणि घनदाट जंगले आहेत. येथे सतरा विविध भाषा बोलल्या जातात. तब्बल बावीस हजार बोली बोलल्या जातात. जगातील हा एकमेव देश असेल जिथे एवढ्या विविधतेतही एकता आहे. आपल्या या देशात दहा लाखाहून अधिक लोक वेगवेगळ्या ३५ भाषा बोलतात. ८० टक्के लोक शेतीवर आधारीत आहेत. जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेली शहरेही याच देशात आहेत. गरीबी आणि बेरोजगारीही येथे आहे. पण तरीही एका मोगल सम्राटाने म्हटले होते, की या पृथ्वीवर स्वर्ग कुठे असेल तर तो येथे आहे, येथे आहे, येथे आहे.

भारत असा देश आहे, जिथे आजही ५१ टक्के लोक निरक्षर आहेत. निरक्षरतेचे एवढे प्रमाण असूनही या देशाने प्रशिक्षित इंजिनियर्स व शास्त्रज्ञांची फौज निर्माण केली आहे. यातील अनेक जण अमेरिकेतील संगणक व्यवसायावर राज्य करत आहेत.

गरीबी, मागासपणा आणि इतर अनेक अडचणी असूनही या देशाने इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक अद्ययावत सॉफ्टवेअर तयार केले आहेत. हे सॉफ्टवे्र आज अमेरिकेतील अनेक कंपन्या वापरत आहेत.

भारतात किमान पाच धर्मांचा जन्म झाला आहे. शास्त्रीय नृत्याच्या तीन शैली आहेत. येथे ८५ राजकीय पक्ष आहेत आणि तीनशे पद्धतीने बटाट्याचा वापर स्वयंपाकात केला जातो. मया सगळ्यामुळेच भारत नेमका काय आहे, हे सांगणे, त्याची व्याख्या करणे अवघड आहे.

भारताच्या बाबतीत महात्मा गांधींनी एकदा म्हटले होते, की हा असा देश आहे, की याच भूमीवरून जगात हवा वाहेल. आज वॉलमार्टपासून मायक्रोसॉफ्ट, मॅकडोनाल्डपासून नॅसडॅकची हवा भारताच्या मार्गे वाहत आहे. अमर्त्य सेनपासून लक्ष्मी मित्तल अख्ख्या जगाला हलवत आहेत. आपल्या गुणांनी संपन्न असलेले या भूमीचे पुत्र आज जगभरात आपला व आपल्या देशाचा अमीट ठसा उमटवत आहेत.

(शशी थरूर संयुक्त राष्ट्रसंघात मोठ्या अधिकारपदावर आहेत. ते मान्यवर स्तंभलेखक व कादंबरीकार आहेत. चेन्नईमध्ये भारतीय प्रजासत्ताकाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे भाषण केले होते.)