बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मागोवा 2008
Written By वेबदुनिया|

हिंसाचाराचे नवनिर्माण

- अभिनय कुलकर्णी

WDWD


चारीबाजूंनी आलेला दबाव लक्षात घेता आतापर्यंत नाकर्तेपणाचे धनी ठरलेल्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख सरकारला राज ठाकरे यांना अटक करावीच लागली. यापूर्वी राज यांना अटक केल्यानंतरही हिंसाचार झाला होता. त्यामुळे याहीवेळी होणार हे अपेक्षित होतेच. त्यामुळे राज्य सरकारने यावेळी विशेष तयारी करून आधी राज यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आणि त्यानंतर राज यांना रत्नागिरीत मध्यरात्री अटक केली. यामुळे हिंसाचाराला अटकाव बसेल असा सरकारचा अंदाज असला तरी तो किती फोल ठरला ते कालपासून सुरू असलेल्या हिंसाचारावरून स्पष्ट होतेच आहे.

हा हिंसाचार हा अपेक्षितच होता. कारण नेत्याच्या मागे उभी असलेली ताकद दाखविण्यासाठी हल्ली हिंसाचार हा एक मार्ग ठरू लागला आहे. थोडक्यात, तुमची उपद्रवक्षमता किती त्यावर तुमचे राजकीय वजन ठरते. राज यांचे वजन बरेच आहे हे यानिमित्ताने त्यांच्या विरोधकांना, सत्ताधार्‍यांनाही कळले असेल. पण हा हिंसाचार समर्थनीय नाही. पोलिसांना न जुमानता राज यांचे कार्यकर्ते तोडफोड, दगडफेक, आगी लावण्याचे उद्योग करत फिरत आहेत. हे पाहून राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न पडतो. यातून कोणते 'नवनिर्माण' साध्य होणार? राज यांचा पक्ष मराठी माणसांसाठी भांडणारा आहे हे खरे. पण याच मराठी माणसाच्या करातून पोसल्या जाणार्‍या बस व इतर सार्वजनिक यंत्रणांची मोडतोड करून, त्यांना आगी लावून काय साध्य होणार? याचा त्रास राज यांच्या मराठी माणसालाच होणार ना? आपलेच उद्योग बंद पाडून आपल्याच मराठी माणसाचा रोजगार यामुळे बुडतोय हे राज समर्थकांच्या लक्षात येत नाही का?
  राज ठाकरेंना अटक ही या वर्षातील मोठी घटना. राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेची स्थापना केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात वादळ निर्माण झाले. राज यांना दिल्ली दबावापोटी सरकारने अटक केली महाराष्ट्रात उसळलेल्या दंग्यांनी हिंसाचाराचे नवनिर्माण केले.      


शिवसेनेच्या तंत्राची पुनरावृत्ती

राज यांचे हे आंदोलन पाहून मागच्या पिढीला चाळीस वर्षापूर्वीच्या शिवसेनेच्या स्थापनाकाळाची आठवण झाली असेल. त्या सगळ्या घडामोडींचा 'रिपीट परफॉर्मन्स' म्हणजे आजचा हिंसाचार असेही म्हणता येईल. याच शिवसेनेच्या मुशीत राज ठाकरे वाढले. पण आता शिवसेना सोडली तरी तिची मुळची संस्कृती त्यांनी सोडलेली दिसत नाही. चाळीस वर्षापूर्वी याच तंत्राचा वापर शिवसेनेने केला होता. पण अखेरीस यातून साध्य काहीच होणार नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेनाही आता याबाबतीत काहीशी मवाळ झाली आहे. 'मनसे' शिवसेनेच्याच मार्गाने जाणार असेल तर चाळीस वर्षापूर्वीची शिवसेना असेच तिचे स्वरूप राहिल.

मराठी माणसांमध्ये राज यांच्याविषयी सहानुभूतीची भावना आहे. मराठी अस्मितेचा मु्द्दा राज यांनी ज्या तडफेने उचलला आणि उत्तर भारतीय वाचाळ नेत्याविरूद्ध ते ज्या पद्धतीने बोलतात त्यामुळे त्यांच्याविषयीची लोकप्रियता आणि आदरही मराठी लोकांमध्ये वाढला आहे. पण या हिंसाचारामुळे त्यांचीही मने दुखावली गेली. अनेकांचा राज यांच्या मुद्यांना पाठिंबा आहे, पण त्यांचा मार्ग चुकीचा आहे, असे वाटते.

असुरक्षित महाराष्ट्

  चाळीस वर्षापूर्वी याच तंत्राचा वापर शिवसेनेने केला होता. पण अखेरीस यातून साध्य काहीच होणार नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेनाही आता याबाबतीत काहीशी मवाळ झाली आहे. 'मनसे' शिवसेनेच्याच मार्गाने जाणार असेल तर चाळीस वर्षापूर्वीची शिवसेना असेच तिचे स्वरूप र      
या आंदोलनामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली ती वेगळीच. उत्तर भारतीय नेत्यांना आधीच महाराष्ट्राबाबत आकस आहे. या हिंसाचारामुळे महाराष्ट्राविषयी त्यांची मने आणखी संकुचित होतील. आधीच जातीय दंगलीत राज्य 'नंबर वन' असल्याचा अहवाल काही दिवसांपूर्वीच आला होता. आता राज्यात सगळ्याच बाबतीत असुरक्षितता आहे, असे चित्र गेले तर त्यातून उद्योग धंदेही राज्यात येणार नाहीत. त्याचा फायदा उठवून नरेंद्र मोदी सगळे उद्योग गुजरातला पळविण्यासाठी बसलेलेच आहेत. नॅनो हे त्याचे ताजे उदाहरण. एवढेच काय आता महाराष्ट्रातील अनेक उद्योग आता हिमाचल प्रदेशमध्येही स्थलांतरीत झाले आहेत. कारण कोणत्याही उद्योगाला शांतता हवी असते. शिवाय आर्थिक धोरणही अनुकूल असावे लागते. केवळ याच कारणामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये उद्योगांना अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकलेले नाही. हिंसाचाराच्या माध्यमातून महाराष्ट्रही याच रांगेत बसला असे चित्र जाऊ नये.

परप्रांतीय मराठीजनांची ससेहोलपट

त्याचवेळी हे राज्य फक्त मराठी लोकांचे इतरांना प्रवेश नाही, अशी भूमिका घेऊनही चालणारी नाही. महाराष्ट्रात उद्योग करणार्‍या अनेक उद्योजकांचे मुळ उत्तर भारतात आहे, ज्यात अनेक मराठी लोकही काम करतात. त्याचवेळी परप्रांतात अनेक मराठी लोकही काम करतात. भलेही त्यांनी स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतला नसेल. पण महाराष्ट्रातल्या आंदोलनामुळे 'ओल्याबरोबर सुकेही जळते' या न्यायाने त्यांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. जमशेदपूरमध्ये 'टाटा मोटर्स'चे अधिकारी बोरवणकर यांच्या घरावर झालेला हल्ला हे त्याचे उदाहरण आहे. आज दिल्ली, इंदूर, ग्वाल्हेर, हरिद्वार, वाराणसी, जमशेदपूर, रायपूर, बिलासपूर यासह अनेक उत्तर भारतीय शहरात मराठी लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांना याचा त्रास होऊ शकतो हे राज यांनी लक्षात घ्यायला हवे.