महादेवाची जागा
- डॉ. उषा गडकरी
भारतीय परंपरेत तेहतीस कोटी देवांना मान्यता दिली आहे. हे सर्वविदित आहे. या देवांमधला सगळ्यात सोपा देव म्हणजे महादेव होय. शंकराला-महादेवाला साधा भोळा देव आणि साध्या भोळ्यांचा देव असेही संबोधले जाते. थोड्याश भक्तीने पावणारा, भक्ताच्या आर्त हाकेला चटकन 'ओ' देणारा देव म्हणजे महादेव, अशी त्याची प्रसिद्धी आहे. परंतु याच कारणामुळे हा देव कित्येकदा मोठ्या अडचणीत सापडतो. असंख्य देवांपैकी भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा महादेवासमोर लागलेल्या दिसतात. कोणी एखादे बेलाचे पान वाहनू, त्याला नोकरी लवून दे म्हणतो तर कोंणी पांढरे फूल वाहून पटकनलग्न जमू दे म्हणतो. कधी कधी तर परस्पर विरोधी मागण्या करणारे भक्तही समोर उभे राहतात. एकजण 'अ' ची बदली दुरसीकडे कर म्हणतो तर, त्याच्याच पाठीमागचा 'अ' ची बदली मुळीच करू नको म्हणतो. या सर्व गोष्टींमुळे हा भोळा सांब पार वैतागून गेला.
कुठे जावे, कुठे लपावे म्हणजे भक्तांचा ससेमिरा पाठीमागे लागणार नाही, याचा तो विचार करू लागला. हिमालयात गौरीशंकर जाऊन पाहिले परंतु तेथेही भक्तांनी पिच्छा सोडला नही. विराण-वैराण स्मशनात वास्तव्य करून पाहिले पण तेथेही भक्त येऊन पोहोचलेच. शेवटी तो भगवान विष्णूंकडे गेला आणि म्हणू लागला, देवा! कसेही करून मला अशी जागा दाखव की, जेथे माझे तथाकथित भक्त पोहोचू शकणार नाही, विष्णूंनी थोडा विचार केला आणि शंकराला एक नामी सल्ला दिला. श्री विष्णू म्हणाले, 'तू माणसाच्या हृदयात खोल लपून रहा. ही माणसे बाहेरच्याच बारा भानगडीत इतकी गुंतली आहेत की, त्यांना आपल्या आत डोकावून पाहण्याची अजिबात फुरसद नाही. तू वर्षानुवर्षे या हृदय-गाभार्यात निवांत पडून रहा.' शंकराने तात्काळ हा सल्ला मानला. तेव्हापासून परमेश्वराने माणसाचे हृदय आपले घर केले आहे. त्यांच्या निकट इतका मोठा ठेवा असूनही ते त्याकडे ढुंकूनही पहात नाहीत. 'तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलासी' अशी त्यांची स्थिती झाली आहे.