बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. विंदा करंदीकर
Written By वेबदुनिया|

ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांचे निधन

अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले, ज्येष्ठ कवी गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर यांचे रविवारी सकाळी मुंबईतील भाभा रूग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. विंदांच्या इच्छेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार न करता त्यांचे देहदान केले जाणार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे मराठी साहित्यविश्र्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे एक मुलगी, दोन मुले, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या सहचारिणी सुमा करंदीकर यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या आ. नीलम गोर्‍हे यांचे ते सासरे होत.

अभिजात मराठी साहित्यावर आपला ठसा उमटविणार्‍या या सारस्वताने कवी, साहित्यिक, समीक्षक, अनुवादक अशा विविध भूमिकेतून मराठी साहित्याची सेवा केली. यंदा पुणे येथे होणार्‍या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. परंतु त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

स्वेदगंगा, मृद्गंध, जातक आदी कवितासंग्रह, राणीची बाग, सशाचे कान आदी बालकविता संग्रह, स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ आदी लघुनिबंध, परंपरा आणि नवता सारखे त्यांचे समीक्षा ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. याशिवाय प्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञ ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र आणि सुप्रसिद्ध इंग्रजी नाट्यलेखक शेक्सपियर याच्या राजा लिअर या नाट्यग्रंथाचे विंदांनी मराठीत भाषांतर केले. संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचे अर्वाचिन रूपांतर करून त्यांनी मराठी साहित्याचा लौकिक आणखी वाढविला. त्यामुळेच त्यांना जनस्थान पुरस्कार, कबीर सन्मान, कोणार्क पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्याव्यतिरिक्त ज्ञानपीठासारखा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मिळविणारे विंदा हे तिसरे मराठी साहित्यिक होत. अष्टदर्शने या त्यांच्या प्रख्यात काव्यसंग्रहासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. विंदा यांनी मंगेश पाडगावकर व वसंत बापट यांच्यासमवोत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत गावागावात काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. या कार्यक्रमांमुळेच अवघ्या महाराष्ट्राला काव्यवाचनाची गोडी लागली हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल.

विंदा करंदीकर यांचा जन्म १९१८ साली सिंधुदुर्गातील धालवली येथे झाला. त्यांनी आपले शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केले. पुढे त्यांनी प्राध्यापकी पेशा स्वीकारला. रत्नागिरीतील बसवेश्वर महाविद्यालय व मुंबईतील सुप्रसिद्ध रूईया आणि एस.आय.ई.एस. महाविद्यालय येथे त्यांनी इंग्रजी साहित्य विषयाचे अध्यापन केले. हैद्राबाद मुक्ती संग्रामातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. साम्यवाद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांच्या काही काळ संबंध होता. सामाजिक दृष्ट्या ते अतिशय संवेदनशील होते. त्यांच्या लिखाणातून गोरगरीबांबद्दल कणव व प्रस्थापितांबद्दलचा रोष प्रकर्षाने दिसून येतो. साम्यवाद, हिंदुत्व व पुरोगामी विचारांचा साकल्याने विचार करणारे ते साहित्यिक होते. त्यांच्या साहित्यावर या सर्व विचारांचा प्रभाव असला तरी कुठल्याही विचारसरणीच्या आहारी ते गेले नाहीत. अत्यंत साधी राहणी हे त्यांचे ठळक वैशिष्ट्य होते.

गेला महिनाभर त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर भाभा रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु रविवारी सकाळी ते अत्यवस्थ झाले व अखेर सकाळी १० च्या सुमारास त्यांचे निधन झाले. वांद्रे उपनगरातील साहित्य सहवास निवास संकुलातील फुलराणी सभागृहात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान व देहदान करण्यात आले आहे. अनेक मान्यवर साहित्यिकांनी विंदांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करून मराठी साहित्यविश्र्वाचे त्यांच्या जाण्याने न भरून येणारे नुकसान झाले असल्याचे प्रतिक्रिया नोंदविली आहे. मुख्यमंत्री, राज्यपाल आदींनीही विंदांच्या मृत्यूबाबत तीव्र शोक व्यक्त केला आहे.