शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

एकादशी पावन

अनंत व्रताचिया राशी
   पाया लागती एकादशी।।


सगळ्या व्रतांमध्ये एकादशीचे व्रत पुण्यप्रद आहे, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे. एकदश म्हणजे अकरा. अकरावी तिथी असते एकादशी. महिन्यातून दोन एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षातली नि एक कृष्ण पक्षातली. चैत्र ते फाल्गुन अशा बारा महिन्यांच्या एकूण चोवीस एकादशी.

भागवत धर्मात एकादशी व्रताचं महत्त्व फारच अधिक मानलेलं आहे. त्यातही आषाढ महिन्याची शुक्ल पक्षातली एकादशी प्रचंड महत्त्वाची हिलाच शयनी एकादशी म्हणतात. हीच महाएकादशी होय. या शयनी एकादशीपासून कार्तिक शुक्ल पक्षातल्या एकादशीपर्यंत श्रीविष्णू भगवान क्षीरसागरात शेष शय्येवर निद्राधीन झालेले असतात. कार्तिकाच्या प्रबोधीनी एकादशीस त्यास जागृतावस्था प्राप्त होते. हिलाच देवोत्थानी एकादशी म्हणतात. आषाढी नि कार्तिकी शुक्ल पक्षीय एकादशीला फार महत्त्व असते, हिलाच सामान्यजन मोठी एकादशी असं म्हणतात.

    व्रतामाजी व्रत एकादशी पावन
    दिंडी जागरण देवा प्रिय
    अष्ट ही प्रहर हरिकथा करी
    वाईचे विट्ठल हरि वदोनिया


हेच या व्रताचे महात्म्य असून यात विट्ठलही रंगून जातो.

भक्तासवे टाळमृदंग वाजती गजरे. विट्ठल प्रेमभरे नाचतसे.

पंढरपूरमध्ये एकादशीला संतांचा मेळा जमतो. देव आणि भक्त यांचा हा परमानंदू अनुभवास येतो. खरोखर हे व्रत जो जीवेभावे आचरतो ईश्वरही त्याच्या सेवेत तिष्ठत असतो. पांडुरंगाला भक्ताचा भाव भारी आवडतो म्हणून दळू लागतो तर द्रोपदीची लाज राखतो. असा हा भगवतं भक्ताचा दास बनतो.

    ऐसे एकादशीचे व्रत. निर्विकल्प जे आचरत
    त्योच घरी हरी निष्टत कांतेसह वर्तमान


म्हणून तर एकादशीचं व्रत करणार्‍या भाविकांना परमसुखाची अनुभूती प्राप्त होते.

     जावे शरण विठोसबासी
     मग सुखासी काय उणे
     करावे व्रत एकादशी
     द्वादशी क्षीराप्रती सेवन


असे संत प्रतिपादन करतात आणि पंढरी जावे म्हणतात

      नेमे जावे पंढरीसी
      तेणे चौर्‍यांशी चुकती


एकादशी व्रत मनोभावे करावं. पांडुरंगाचं मनामनी स्मरण करीत असावं. हरिजागरण करावं. उपवास कराव.

      आषाढी पर्वकाळ एकादशी दिन.
      हरिजागरण देवा प्रिय.
      निराहारे जो व्रत करी आवडी
      मोक्ष परवडी त्याचे घरी.


पंढरीला जाऊन विट्ठलाचं दर्शन घेऊन एकादशीचं पर्व समाधानाने पाडावं. खरोखर एकादशीचं व्रत केल्याने मनाची शुचिता घडते, देहाची शुध्दता होते. वासनाविकार दूर पळतात. जीवाला भक्तिभाव जडून जातो. आपपर भाव पूर्णतः मावळून जातो. 'आपले आपण भासे'ची अवस्था होते. अशा भक्तीपथावर पावलं चालू लागतात. समररसतेची वाट समभावाच्या हिरवळीवर

      एकादशी एकादशी. जया छंद अहर्निशी.
      व्रत करी जो नेमाणे. तया वैकुंठासी घेणे.


 
पंढरपुरी चंद्रभागेच्या वाळावंटात 'ग्यानबा तुकाराम'च्या गजरात वारकरी एकादशी उत्सव करतात. आनंदात संतांची मान्दियाळी जमते. ज्ञानोबा, चोखोबा, नामदेव, गोरोबा, सावतोंबा सगळ्यांचा वैष्णव धर्म समानतेचा वारकरी आनंदाने सोहळा मानतात. हाच समानतेचा उत्सव मानवता धर्माची ध्वजा उभारली जाते.
                      नाचू आनंदे रंगून म्हणत. 

  - विभावरी