सभागृहापुढे एक अरुंद असा गाभारा आहे. या गाभार्यात जगदंबेची काळ्या पाषाणातील सुरेख मूर्ती आहे. असं म्हणतात, हे मंदिर आणि अमरावतीचे देवीचे मंदिर हे भुयारी मार्गांनी जोडलेले आहे. या मंदिरानंतर आणखी एक छोटे मंदिर लागते. ते आहे विठ्ठल रुखमाईचे. अंबिका ही इथली कुलदेवता असल्यामुळे आधी तिचे दर्शन घ्यायचे आणि मग विठ्ठल रुखमाईचे दर्शन घ्यायचे अशी प्रथा येथे आहे. या मंदिराभोवती फरश्यांनी बनवलेला ऐसपैस प्रदक्षिणेचा मार्ग आहे. या मंदिराला प्रदक्षिणा घालताना आपसूकच गावाचं चारही बाजूने दर्शन होतं.
इथे पुरातत्व खात्याने उत्खनन केले तेव्हा पूर्वीच्या संपन्न गावाच्या खाणाखुणा दाखविणारे काही अवशेष सापडले. त्यावरून येथे पूर्वी शहर वसले असावे, असा निष्कर्ष काढता येतो. इथे प्रचलित असलेली एक दंतकथा अशी -
रुक्मिणीचा भाऊ रुक्मीने त्याचा मित्र शिशुपालला रुक्मिणी देण्याचा शब्द दिला होता. पण अचानक कृष्णाने येऊन तो डाव उधळून लावला. त्यामुळे संतापलेल्या शिशुपालाने, 'तुझी राजधानी पालथी होईल' असा शाप दिला आणि कौंडिण्यपूर शहरचे शहर पालथे होऊन गाडले गेले. याचा पुरावा देतांना गावकरी असेही सांगतात, जेव्हा उत्खनन केलं तेव्हा ज्या वस्तू सापडल्या त्या सगळ्याच उपड्या घालून ठेवल्यासारख्या होत्या.
असं हे कौंडिण्यपूर! संपूर्ण भारतावर ज्यांच्या जीवनकथांचा प्रभाव आहे, त्या राम आणि कृष्ण ह्या दोन महापुरुषांशी संबंध सांगणारे. हे कृष्णाचे सासर तर आहेच पण रामाचे वडिल दशरथ यांच्या आईचे माहेरही हेच. म्हणजे दशरथाचे आजोळ. असे हे दंतकथांनी गाजलेले टूमदार गाव, आणि रुक्मिणीचे माहेर एकदा तरी जावे असेच आहे.
साभार : 'महान्यूज'