गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By वेबदुनिया|

श्वासातून साधा मनःशांती

सांसारिक आयुष्यात 'सुख थोडं दुःख भारी' अशी स्थिती असायचीच. त्यातच जगण्याचा वेग वाढल्याने धावपळही वाढलीय. असा परिस्थितीत जीवनात तणाव अपरिहार्य आहे. त्याचवेळी मनाची शांती, संतुलन राखणेही तितकेच गरजेचे आहे.

पण हे सहज मिळू शकते का? हा एक प्रश्नच आहे. प्रयत्न केल्यानंतर मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. तणाव असल्यास आपल्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा. तणावात श्वासावर लक्ष दिल्याने थोड्याफार प्रमाणात का असेना आपण शांत होतो. श्वसन क्रियेची जी लय असते तिचा आपल्या शरीर आणि मनावर देखील परिणाम होत असतो. श्वास आत घेताना 'शांतता आत येवो' आणि श्वास सोडताना 'तणाव बाहेर जावो' असे मनातल्या मनात म्हणा. असे एक मिनिट जरी केली तरी तुम्ही बर्‍यापैकी 'टेन्शन फ्री' होतात.

मनुष्य वर्तमान विसरून भूतकाळ किंवा भविष्यकाळाचाच विचार करीत राहतो. भूतकाळात घडलेल्या काही दु:खद घटना आठवून मन अस्वस्थ होते आणि तणाव निर्माण होतो. आपण वर्तमानात काय करीत आहोत फक्त याच गोष्टीचा विचार करावयास हवा. त्यामुळे आपली जागरूकता वाढण्यास मदत होईल. मनाला सुख, शांती आणि आनंद प्राप्त होतो.

रोज रात्री सहा ते सात तास झोप घेतल्याने शारीरिक तसेच मानसिक शांती मिळते. आपली झोप खराब होऊ नये यासाठी सतर्क राहा. प्रत्येक व्यक्ती महत्त्वाकांक्षा साध्य करण्याच्या नादात 'टेन्शन'च्या चक्रव्यूहात अडकतो.

एखाद्या आवडत्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहून किंवा मनाला शांती देणार्‍या चित्रांची कल्पना करूनही हे शक्य आहे. जी व्यक्ती फक्त स्वत:चाच विचार किंवा स्वार्थ पाहत असेल त्याला सुख, शांती आणि आनंदाचा लाभ मिळू शकत नाही. दुसर्‍यांना सहानुभूती दाखविणे, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होण्यामुळे मानसिक सुख मिळते. आपल्याला यश प्राप्त करण्यासाठी या प्रकारचे वातावरण बनवावे लागते.

हा लेख आपणास कसा वाटला?