निर्माता- फिरोज नडियादवाला दिग्दर्शक- अनिस बझ्मी संगीत- हिमेश रेशमिया, आनंद राज आनंद, साजिद वाजिद कलावंत- अक्षय कुमार, कैतरीना कैफ, नाना पाटेकर, मल्लिका शेरावत, अनिक कपूर, परेश रावल, फिरोज खान
डॉ. घुंगरू एक नामवंत डॉक्टर आहेत. त्यांच्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट म्हणजे भाचा राजीवला लग्नासाठी एक चांगली मुलगी पाहणे. अट फक्त एकच. मुलगी चांगल्या, प्रतिष्ठित घराण्यातील हवी. मुलीच्या घरच्यांना अजिबात गुन्हेगारी पार्श्वभूमी नको. तुरूंग वगैरे काय असतो हे त्यांना माहितही नको एवढे ते स्वच्छ चारित्र्याचे असले पाहिजेत. राजीवसाठी खूप मुली बघितल्या जातात. पण डॉक्टरांना एकही पसंत पडत नाही. आता आपले लग्न कधीच होऊ शकत नाही, याची खात्री राजीवला पटते.
उदय शेट्टी अंडरवर्ल्ड डॉन आहे. त्याला बहिण संजनासाठी चांगला मुलगा हवाय. स्वतः डॉन असला तरी त्याला जावई मात्र साधा, सरळ, सज्जन आणि सुशिक्षित हवा असतो. तोही अनेक मुलांना पहातो. पण त्या मुलांना उदय कोण आहे हे कळतं तेव्हा त्यांची फें फें उडते. संजनालाही असेच वाटते, की आता आपले लग्न होणे नाही.
पण व्हायचे तेच होते. राजीव व संजना यांची अचानक भेट होते आणि त्यांचे प्रेम जमते. एक ज्योतिषी तर त्यांची कुंडलीही तयार करतो. दोन्ही कुटुंबीय परस्परांना भेटतात. संजनाला पाहून डॉ. घुंगरूही खुश होतात. त्यांना संजनासारखीच मुलगी हवी असते. उदयलाही राजीव आवडतो.
पण शेवटी सत्याचे कोंबडे कितीही झाकून ठेवले तरी आरवायचे थोडीच रहाते? डॉ. घुंगरू यांना उदयची गुन्हेगारी पार्श्वभूमी कळते. मग उदय आपल्या भाईगिरीचा वापर करून त्यांना धमकावतो. त्यांच्यावर काहीही फरक पडत नाही. ते या लग्नाला तीव्र विरोध करतात.
पण इशिका ऊर्फ इशाचा कथानकात प्रवेश होतो आणि एकदमच कथेला वळण मिळते. आपण राजीवचा लहानपणीची प्रेयसी असून लहानपणीच आपले त्याच्याशी लग्न झाल्याचे ती सांगते. पण राजीवच्या म्हणण्यानुसार इशावर उदय व मजनूभाई हे दोघेही लट्टू असतात.
अशा परिस्थितीत राजीव व संजनाचे लग्न होते का? इशाचे लग्न खरोखरच राजीवशी झाले असते का? नाही तर मग इशाचे लग्न कोणाशी होते? या प्रश्नांच्या उत्तरासाठी वेलकम पहायला हवा.
|