‘घायल' आणि ‘दामिनी' यांसारख्या सशक्त चित्रपटांचे प्रसिध्द दिग्दर्शक राजकुमार संतोषी आता प्रेक्षकांसमोर आणखी एक संवेदनशील चित्रपट घेऊन येत आहेत. ‘हल्ला बोल' असे त्याचे नाव असून यात अजय देवगण, विद्या बालन, पंकज कपूर, सायली भगत आणि दर्शन जरीवाला हे प्रमुख कलावंत आहेत. या चित्रपटाचे निर्माते आहेत अब्दुल सामी सिध्दीकी.
‘हल्ला बोल' हा चित्रपट युवा मित्रांच्या अवती - भोवती घुटमळत जातो. आशफाक (अजय देवगण) हा नवोदीत अभिनेता आहे. अभिनयाची त्याला भयंकर आवड आहे. आपल्यातील कलेला वाव देण्यासाठी तो पथनाटयात काम करतो. पथनाटय सादर करणारा सिध्दू (पंकज कपूर) पुर्वायुष्याचा डाकू. पण कालांतराने सुधारलेला व समाजासाठी काहीतरी करायचं या भावनेपोटी तो पथनाटयातून समाजात जागरूकता आणण्याचा प्रयत्न करतो. पुढे आशफाकचे नशीब फळफळतं आणि त्याला चित्रपटात अभिनयाची संधी मिळते आणि रातोरात तो सुपरस्टार समीर खान बनतो. पण या यशात तो इतका गुरफटतो की स्वतःची ओळख विसरतो. त्याच्या पत्नीत व त्याच्यात दुरावा निर्माण होतो. परिणामी दोघांत सारखी खडाजंगी होत रहाते. त्याचवेळी त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडते आणि कथा वेगळया वळणावर जाते.
राजकुमार संतोषी सांगतात, की समाजाविरूध्द जे लोक काम करतात त्यांना आपण सर्व मिळून विरोध केला पाहिजे. असे केल्याने आपण निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचे सकारात्मक परिवर्तन आणू शकतो. यात अजय देवगण अशफाक उर्फ समीर खानची एक वेगळया प्रकारची भूमिका साकारत आहे. एका छोटया शहरातून आलेल्या तरूण मुलाचे एक यशस्वी फिल्मस्टार बनणे, त्याचा संघर्ष या सगळया गोष्टी अजयने अतिशय चांगल्या पद्दतीने दाखविल्या आहेत. या भूमिकेला केवळ अजय देवगणच न्याय देऊ शकतो या ठाम विश्वासामुळेच संतोषींनी अजयची निवड केली.
त्याचप्रमाणे त्यांना विद्या बालनच्या आतापर्यंतच्या भूमिकांनी खूपच प्रभावित केले. म्हणून नायिकेसाठी विद्याची निवड करण्यात आली. यात तिने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका केली आहे. यात पंकज कपूरचीही प्रभावी भुमिका आहे व या भूमिकेमूळे चित्रपटाला एक उत्तम दर्जा प्राप्त झाला आहे असा संतोषींचा दावा आहे. सायली भगत हिला यात छोटीशीच पण एक सशक्त संगीतमय भूमिका दिली आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
|