'गोलमाल' (२००६) प्रदर्शित होण्यापूर्वी रोहीत शेट्टी हे नाव फारसे कुणाला माहित नव्हते. 'गोलमाल'ने यश मिळविल्यानंतर रोहितला स्वतःची ओळख मिळाली. आता रोहित संडे नावाचा चित्रपट घेऊन येतो आहे. २५ जानेवारीला तो प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पांचा हा सारांश.
'संडे' हेच नाव का? हा प्रश्न मला बर्याच जणांनी विचारला. हा चित्रपटच संडे अर्थात रविवारवर आधारीत आहे. म्हणून मला तेच नाव योग्य वाटलं. आम्ही जेव्हा चित्रपटाचं नाव ठरवायला बसलो तेव्हा काहीही सुचत नव्हतं. आम्हाला असं नाव हवं होतं ज्यातून हा चित्रपट विनोदी, एक्शन किंवा थ्रिलर आहे हे कळू नये. त्यामुळे संडे या नावावर एकमत झालं.
'संडे' कसा बनला आहे? खरं सांगतो, माझ्या अपेक्षांपेक्षा हा चित्रपट चांगला बनला आहे. याचं सारं श्रेय त्यातल्या कलाकारांन जातं. अजय देवगण, अर्शद वारसी, इरफान खान आणि आयेशा यांनी कमालीचा सुंदर अभिनय केला आहे. लोकांना नक्की चित्रपट आवडेल. अजय यात एक भ्रष्ट पोलिस अधिकारी आहे. त्याला पहिल्यांदा भूमिका ऐकवली तेव्हा त्याने लगेच हो म्हटले यावरून भूमिका लक्षात घ्या. याशिवाय विनोदी भूमिकेत माहिर असणारा अर्शदही यात आहे. तो एका टॅक्सीचालकाची भूमिका करतो आहे. इरफान खानने साकारलेली भूमिका आतापर्यंत पहिल्यांदाच केली असेल. या सगळ्यांबरोबर काम करण्याचा मजा काही औरच होता.
चित्रपट वेगळा आहे? सध्या बॉलीवूडमध्ये अनेक कॉमेडी चित्रपट येताहेत. पण त्यांच्याहून 'संडे' वेगळा आहे. कारण यात एक्शन, कॉमेडी व थ्रिल यांचा समन्वय आहे. हसण्याबरोबर पुढे काय होईल याची उत्सुकताही नक्कीच लोकांना लागून राहील. म्हणूनच इतर चित्रपटांपेक्षा हा वेगळा आहे.
'गोलमाल रिटर्न'बाबत 'गोलमाल' लोकांना खूप आवडला. म्हणूनच त्याचा दुसरा भाग 'गोलमाल रिटर्न' या नावाने बनवत आहे. यात 'गोलमाल'चे चार नायक अजय देवगण, तुषार कपूर, अर्शद वारसी आणि शर्मन जोशी होते. ते एकाच नायिकेमागे- रिमी सेन- लागलेले असतात. 'गोलमाल रिटर्न'मध्ये चार नायक असून नायिकाही चार आहेत. त्यामुळे आणखी मजा येईल. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होईल.
|