निर्माता : संजय कोटाडिया, कनू पटेल, घनश्याम पटेल दिग्दर्शक : रजतेश नायर संगीत : सोहेल सेन, शिवानी कश्यप कलाकार : के के मेनन, मनीषा कोईराला, प्रवीण डबास, सोनाली कुलकर्णी, रणवीर शौरी, रितुपर्णा सेनगुप्ता, अंकुर खन्ना, नौहीद
आयुष्य म्हणजे महामार्ग आहे. पुढच्या वळणावर काय असेल काहीही सांगता येत नाही. पण तरीही आपला पुढचा प्रवास निश्चिंत होईल, अशी खात्री बाळगून आपण जगत असतो. जगण्याच्या या प्रवासातील कडू गोड प्रसंगांकडे थोड्या विनोदी नजरेतून पाहिलं तर काय दिसेल? तेच सिर्फ या चित्रपटात दाखविले आहे.
जीवनातील धावपळीचा नात्यांवर काय परिणाम होतो. एकाची समस्या दुसर्यासाठी विनोदाचा विषय कसा ठरतो? हेही यात दाखविले आहे.
या चित्रपटाची कथा चार जोड्यांच्या अवती-भोवती फिरते. या जोड्या आहेत के.के. मेनन-मनीषा कोईराला, रणबीर शौरी-सोनाली कुलकर्णी, प्रवीण दबास-रितुपर्णा सेनगुप्ता आणि अंकुर खन्ना-नौहीद सायरसी.
हे सर्वजण समाजातील वेगवेगळ्या स्तरातून आले आहेत. त्यांच्या आयुष्यात काही ना काही कमी आहे. कोणाकडे पैसा आहे पण प्रेम नाही, प्रेम आहे पण पैसा नाही. एका जोडीचा तर परस्परांवरील विश्वासच नाहीसा झाला आहे. एका दाम्पत्याकडे परस्परांसाठी वेळ नाही. पण जीवनातील एका वळणावर ही जोडपी एकत्र येतात. आणि या वळणावर त्यांच्यासमोरील प्रश्नांचे काय होते? ते सोडविण्यात ते यशस्वी होतील का? हे जाणून घेण्यासाठी 'सिर्फ' पहायला हवा.
दिग्दर्शकाबद्दल: या चित्रपटाचा दिग्दर्शक रजतेश नायर असून त्याने सहाय्यक दिग्दर्शकाच्या रूपात राजकुमार संतोषीसोबत 'लज्जा', 'पुकार', आणि 'चायना गेट' मध्ये काम केले आहे. रजतेश कार्यकारी निर्माता के. के. नायरचा मुलगा आहे.
आपल्या चित्रपटाबद्दल तो सांगतो, 'आपण एकमेकांच्या जीवनात डोकावून बघितल्यास प्रत्येकाच्याच जीवनात काही ना काही अडचण असते. आपल्याकडे असलेल्या बाबींनी आपण संतुष्ट नसतो. आपल्याला वाटते, की समोरच्याकडे आहे, ते आपल्याकडे हवे. पण समोरच्याकडे काय दुःख आहे ते मात्र आपल्याला माहित नसते.
'सिर्फ' मध्ये चार जोडपी आहेत. विचारांमध्ये तफावत असून देखील त्यांच्यात एक गोष्ट समान आहे. ते सर्वजण आशावादी आहेत. एक दिवस सर्व व्यवस्थित होईल यावर त्यांचा विश्वास आहे.'
|