निर्माता : रंजन प्रकाश - सुरेंद्र भाटीया दिग्दर्शक : एस. चंद्रकांत संगीत : सिद्धार्थ सुहास
कलावंत : नेहा धुपिया, राजपाल यादव, अमृता अरोरा, आशिष चौधरी, अनुपम खेर, रती अग्निहोत्री.
भांडत नाहीत, असे पती-पत्नी या जगात नसतीलच कदाचित. त्यामुळे दाम्पत्यातील भांडणे हा चित्रपटांचा विषय यापूर्वीही अनेकदा झाला आहे. कधी गंभीर तर कधी विनोदाच्या माध्यमातून या विषयाचे सादरीकरण झाले आहे. 'रामा रामा क्या है ड्रामा' हा चित्रपट या भांडणांकडे विनोदी पद्धतीने पहायला लावतो. या विषयात विनोदाला बराच वाव असूनही चित्रपट मात्र, माफक रंजन करण्यापर्यंतच झेप घेतो.
चित्रपटात कथा साधी आहे. किंबहूना कथाच सशक्त नसल्याने विनोदाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. दृश्यांच्या माध्यातून चित्रपट पुढे सरकत राहतो इतकेच. दिग्दर्शकाने चित्रपट चांगला बनविण्याचा प्रयत्न केला आहे. पण कमकुवत पटकथेमुळे हा प्रयत्न वाया गेला आहे. काही दृश्यांमध्ये संवाद कमी आहेत, परिणामी लहानशा संवादालाच ओढून-ताणून वाढविताना कलाकाराची दमछाक होताना जाणवते. त्यामुळे अकारण दृश्येही मोठी झाली आहेत.
स्वतःच्या बळावर चित्रपट ओढून नेण्याइतके कलाकारही ताकदीचे नाहीत. राजपाल यादव अभिनेता म्हणून चांगला आहे, पण नायक म्हणून तो चित्रपट यशस्वी करू शकत नाही.
या चित्रपटाची कथा अशी. मि. खुरानाचे (अनुपम खेर) ऐकून संतोष (राजपाल यादव) शांतीशी (नेहा धुपिया) लग्न करतो. पण शांतीच्या स्वप्नातील राजकुमार आणि संतोष एकमेकांच्या तुलनेत फारच वेगळे असतात. त्यामुळेच त्यांच्यात भांडणे व्हायला सुरुवात होते. संतोषचा बॉस (आशिष चौधरी) हा देखील पत्नी खुशीसोबत (अमृता अरोरा) फारसा आनंदी नसतो. पण तरी देखील त्याचे पत्नीवर प्रेम असते. तो तिच्यासोबत आनंदी असल्याचे भासवत असतो. संतोषला स्वत:च्या पत्नीपेक्षा दुसर्या कशा चांगल्या हेच सांगण्यात रस असतो. या दोन्ही दाम्पत्यात काही तरी गैरसमज होतात. पुढे ते दूर होऊन सर्व जण गुण्यागोविंदाने राहू लागतात.
पण भांडणे हा चित्रपटाचा विषय असला तरी संतोष आणि शांती यांच्यातील भांडण का, कशामुळे होते, याचा थांगपत्ताच लागत नाही. हास्य निर्मितीसाठी विनाकारणच भांडणे घुसविली आहेत, असे वाटते. संतोषच्या तोंडी शांतीपेक्षा अधिक संवाद असल्याने त्यांच्यात ताळमेळ नाही. राजपाल यादवने अभिनयात वेगळे काही करण्याचा प्रयत्नही केला नाही. इतर चित्रपटाप्रमाणे तो ह्याही चित्रपटात वावरतो. संतोषच्या भूमिकेत त्याचे वय जास्त जाणवते. एखादा कमी वयाचा नायक या भूमिकेला न्याय देऊ शकला असता. नेहा धुपियाला चित्रपटात कमी वाव आहे. तिच्या ग्लॅमरचाही उपयोग केल्याचे जाणवत नाही. अभिनयात नेहा अजूनही कच्ची आहे. अमृता अरोरा आणि आशिष चौधरी यांची स्थिती याहून वेगळी नाही. अनुपम खेरनेही प्रेक्षकांची निराशाच केली आहे.
शीर्षक गीताव्यतिरिक्त नेहावर चित्रित केलेले एक गाणे गुणगुणण्यासारखे आहे. नेहावर चित्रित झालेल्या गाण्याची कोरियोग्राफी चांगली आहे.
|