निर्माता- देवगण फिल्म्स दिग्दर्शक- अजय देवगण संगीत- विशाल भारद्वाज कलाकार- अजय देवगण, काजोल, सुमीत राघवन, दिव्या दत्ता, करण खन्ना, इशा श्रावणी रेटिंग : 2.5/5
'यू, मी और हम'च्या निमित्ताने अजय देवगणची दिग्दर्शक होण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. निर्माता म्हणून अजयची कामगिरी तितकी चांगली नव्हती, पण दिग्दर्शनात मात्र त्याने त्यापेक्षा उजवी कामगिरी केली आहे.
पहिल्या दिग्दर्शनसाठी त्याने प्रेमकथेलाच प्राधान्य दिले. सध्या प्रेमकथा पडद्यावरून गायब झालेल्या असताना अजयने हे धाडसच केल्याचे म्हणावे लागेल. या चित्रपटाची कथा साधारणपणे अशी आहे.
एका जहाजावर अजय आणि पिया (काजोल) यांची प्रेमकहाणी सुरू होते. अजय या जहाजावर मित्रांबरोबर आलेला असतो. पिया तेथेच काम करत असते. पियाला पाहताच अजयला ती आवडते. पिया गटवण्याचे सगळे उपाय तो करतो. पण ती काही त्याला बघत नाही. जहाज सोडताना तो आपला पत्ता तिच्याकडे सोडतो. त्यानंतर काही महिन्यांनी पिया त्याच्याकडे जाते आणि मग दोघे लग्न करतात.
या कथेला वळण मिळते, ते पियाला अल्झायमर हा रोग असल्याचे कळल्यावर. या रोगामुळे पियाची स्मृती गायब होत रहाते. कधी ती आपल्या मुलांना तर कधी पतीला विसरते.
तिची ही अवस्था पाहून अजय तिला एका केअर सेंटरमध्ये दाखल करतो. पण तिला असे सोडणे हा आपल्या स्वार्थाचा भाग असल्याचे लक्षात आल्यावर तो तिला घरी घेऊन येतो. त्याचे पियावर अगदी सच्चे प्रेम असते.
या मुख्य कथानकाला घटस्फोटाच्या उंबरठ्यावरचे एक विवाहित जोडपे आणि प्रणयात धुंद झालेले एक जोडपे यांचे उपकथानक जोडले आहे.
चित्रपटाची कथा मराठीत काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या गोजिरी चित्रपटासारखी आहे. तिथ कथा अतिशय संयतपणे आणि छान मांडली आहे. पण दिग्दर्शक अजयने तिला फार ताणली आहे. सुरवातीला बरा वेग असलेली कथा पियाच्या आजाराबाबत कळल्यानंतर मंदावते. या काळात थोडे फार हसविण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. पण तो फुटकळ आहे.
सहा भूमिकांभोवती चित्रपट फिरतो. सतत त्यांना पाहिल्यानेही एक प्रकारची नीरसता येते. पण एकूणात विचार केला, तर दिग्दर्शक म्हणून अजयला भवितव्य चांगले आहे. त्याने चित्रपटाला कात्री लावण्याचे थोडे तरी धैर्य दाखविले असते तरी चित्रपट प्रभावी झाला असता.
अभिनयाच्या बाबतीत अजयचा अभिनय चांगला आहे. पण लूक चांगला नाही. तो काहीसा थोराड दिसतो. त्याची वेशभूषाही त्याला साजेशी नाही. काजोलचा अभिनय अर्थातच प्रभावी आहे. आजही ती तितकीच उत्साही आणि फ्रेश वाटते. करण खन्ना, सुमीत राघवन, इशा श्रावणी व दिव्या दत्ता ठीक. चित्रपटात क्लोज अप दृश्यांचा अतिवापर आहे. अश्वनी धीरचे संवाद अर्थपूर्ण आहेत. संगीतकार विशाल भारद्वाजची कामगिरी निराशाजनक आहे.
एकूणातच भावनात्मक चित्रपट ज्यांना आवडतात, त्यांना 'यू, मी और हम' नक्की आवडेल. मात्र, त्यासाठी त्यांना सहनशक्तीही वाढवावी लागेल.
|