निर्माता- राकेश रोशन दिग्दर्शक- जयदीप सेन संगीत- राजेश रोशन कलाकार- अर्शद वारसी, इरफान खान, राजपाल यादव, सुरेश मेनन, जुही चावला, दिया मिर्झा, झाकीर हुसेन व रजत कपूर.
गोंधळ जर राकेश रोशन रोशनच्या डोक्यातच असेल तर मग त्याने लिहिलेल्या कथेवर जयदीप सेन नावाचा दिग्दर्शकही बिचारा काय करेल? मग क्रेझी-४ हा वेड्यांचा बाजार न होता तरच नवल.
दिग्दर्शकाला अपेक्षित क्रेझी ४ हा खरोखरच वेड्यांचा बाजार झाला आहे. ही कथा आहे, चार वेड्यांची. वेड्यांपेक्षा घनचक्कर असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. यातला राजा (अर्शद वारसी) याला राग फार पटकन येतो. एखाद्याने सिगरेटचा धुर जरी याच्या तोंडावर सोडला तर हा त्याला मारायला उठेल. आता ही कुणा सर्वसामान्य माणसाचीही प्रतिक्रिया असेल, म्हणून त्याला कुणी क्रेझी म्हणणार नाही. दुसरा डॉ. मुखर्जी स्वच्छता आणि टापटिप याचा भोक्ता आहे. त्याचवेळी डब्बू (सुरेश मेनन) घनचक्करसारखी एक कृती करतो. आणि गंगाधर राजपाल यादव हा मात्र खरोखरच घनचक्कर आहे. कारण तो भूतकाळातच वावरत असतो.
आता चार जणांची ही अशी विचित्र परिस्थिती म्हणून ते 'क्रेझी' आहेत, असे दिग्दर्शकाने ठरवून टाकलेय. त्यांच्यावर डॉ. सोनाली (जूही चावला) उपचार करत असते. एकदा ती या सगळ्यांना भारत- इग्लंड सामना पहायला घेऊन जाते. (का? कारण कळत नाही.) जातानाच तिचे अपहरण होते. आणि हे चार जण मग तिला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवतात. हे चित्रपटाचे कथानक.
कथानकच वेड्यांचा बाजार असेल तर चित्रपट काय वेगळे असणार? कथेच मुळात फारसा दम नाही. पटकथा बांधीव नाही. कलाकार चांगले असूनही विनोद निर्मितीच्या शक्यता वाया घालवल्या आहेत. त्यामुळे 'क्रेझी ४' हा नावाला साजेसा चित्रपट होतो. चित्रपट कुठेही सलगपणे हसवत नाही. तुकड्या तुकड्यात काही प्रसंग हसविणारे आहेत.
मध्यंतराच्या पूर्वीचा भाग छान जमला आहे. त्यानंतर मात्र सगळा आनंदी आनंद आहे. कदाचित म्हणूनच की काय चित्रपटात तीन आयटम सॉंग आहेत. त्यातील एक राखीताई सावंतावर आहे. ते कसे असेल, याची कल्पना यावरूनच येते. दुसरे शाहरूखवर आहे. ते छान आहे, असे वाटल्यानंतर आपण ह्रतिकचे आयटम सॉंग पहातो, आणि शाहरूखचा प्रभाव पूर्णपणे निघून जातो. पण हे सॉंग इतक्या शेवटी टाकले आहे, की प्रेक्षकांना धरून ठेवायसाठीच त्याची योजना तिथे केली असावी हे कळते.
दिग्दर्शकानेच हातात असलेल्या बाबींचा चांगला उपयोग करून घेतलेला नाही. तिकडे अश्विनी धीरचे संवाद पटकथेसारखेच नीरस आहे. अर्शद वारसी क्रेझी वाटण्यापेक्षा संतापी वाटतो. इरफान पठाणला वाया घालवला आहे. राजपाल यादव तेवढा लोकांना हसवतो. सुरेश मेनन ठीक. जूही चावलाच्या वाट्याला आलेली भूमिका छोटी आहे. काही वेला दिया मिर्झाही दिसते.
राजेश रोशनचे संगीत बकवास आहे. एकच गाणे ऐकण्यासारखे आहे, त्याचे संगीत मात्र दुसर्याचेच आहे. जमेची बाब एवढीच की चित्रपट दोन तास आणि काही मिनिटांचा आहे. त्यामुळे छळ फार होत नाही. हसून सोडून द्यायचे असेल तर चित्रपट बघायला हरकत नाही.
|