अति राग नि भीक माग !

अभिनेता नाना पाटेकरला अखेर आपल्या चुकीचा पश्चात्ताप होतोय. नानाचं टाळकं सरकलं की समोर असलेल्या कुणाचं काही खरं नसतं. राजनीती या चित्रपटाच्या सेटवरही असंच घडलं. दिग्दर्शक प्रकाश झा शी त्याचं वाजलं नि त्याची परिणती नानाच्या हातून हा चित्रपट निसटण्यात झाली. पण आपल्या स्वभावामुळे हे घडलं याची कबुली आता नाना देतोय. नाना या चित्रपटात कृष्णाच्या भूमिकेत होता. त्यात त्याच्या तोंडी एक गाणं टाकण्यात आलं. हे गाणं नानानेच गावं असं प्रकाश झा यांचा आग्रह होता. पण नानाने त्यास नकार दिला. अखेर हे गाणं राशिद खानने गायले. या गाण्याच्या शुटींगसाठी नाना पोहोचला असताना हे गाणं रेकॉर्डवरून पुसलं गेल्याची बातमी त्याला कळली. त्यानंतर नाना आणि प्रकाश झा यांच्यात बोलणे झाले. त्यावेळी झा यांनी हे गाणं नानानेच गावं असं सुचवलं. या मुद्यावरून वाद सुरू झाला तो इतका वाढला की नानाच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यातूनच तो झा यांना अद्वातद्वा मनात येईल ते बोलला. त्यावरून दोघांत खूप वाजले. याचा परिणाम झा यांना नानाला चित्रपटातून काढून टाकण्यात झाला. आता नानाला या सार्याचा पश्चात्ताप होतोय. आपण आपला संताप नियंत्रणात ठेवू शकत नाही, याचे त्याला वाईट वाटतेय. या अनावर होणार्या रागापोटी आयुष्यात खूप काही गमावले आहे, याची जाणीवही त्याला आहे. आपल्या या संतापामुळे झा यांचे किती नुकसान झाले याचीही त्याला कल्पना आहे. पण या रागामुळे आपणही किती गमावले आहे, हेही त्याला आठवते आहे. नाना, संताप आवर रे. तुझ्या चांगल्या चांगल्या भूमिका आम्हाला पहायच्या आहेत. अति राग नि भीक माग ही म्हण तुला आठवतेय का?