मीनाकुमारी म्हणजे बॉलीवूडला पडलेले एक सुंदर स्वप्न होते. जे अल्पकाळासाठी दिसले आणि भंग पावले. ते भंगले तेव्हा लोकांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहिले. 'ट्रॅजेडी क्वीन' हा किताब(?) मीनाकुमारीला मिळाला. पण तिचे खासगी आयुष्यही एक 'ट्रेजेडी'च ठरली. तिचे सौंदर्य आणि अभिनयाला एक कारूण्याची झाक होती.
उगवत्या सूर्याला नमस्कार करणार्या बॉलीवूडमध्ये भूतकाळातल्या तर सोडून द्या पण कालचा कलावंत आज अपयशी ठरला तरी ढुंकून पाहिले जात नाही. मीनाकुमारीच्या बाबततही असेच घडले. एकेकाळची ही 'क्वीन' नंतर पार विस्मरणात गेली.
नायिका म्हणून अजरामर ठरलेल्या मीनाकुमारीचा सुरवातीचा प्रवास बालकलाकार म्हणूनच झाला. खरे तर कोवळ्या वयातच मीनाला कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे चित्रपटात काम करावे लागले. 'लेदरफेस' या 1939 मध्ये आलेल्या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम करणार्या मीनाचे वय केवळ सहा वर्षे होते. विजय भट्ट यांच्या या चित्रपटात बालकलाकार मीनाला पंचवीस रुपये मानधन मिळाले होते.
13-14 वर्षे या कोवळ्या वयातच तिला नायिकेचे रोल मिळायला सुरुवात झाली. काही गाणीही तिने गायली. बालकलाकार म्हणून बर्याच चित्रपटात काम केल्यानंतर विजय भट्ट यांनीच तिला 'बैजू बावरा'मध्ये प्रमुख भूमिका देऊन प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन बसविले. 1952 साली रिलीज झालेल्या या चित्रपटाने मुंबईत एकाच थिएटरमध्ये शंभर आठवडे चालून एक रेकॉर्ड नोंदविला होता. याच वेळी फिल्मफेअर पुरस्कारांची सुरुवात झाली.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पहिला फिल्मफेअर पुरस्कार 'बैजू बावरा' तील अभिनयासाठी तिला प्रदान करण्यात आला होता. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचे लागोपाठ बारा पुरस्कार पटकाविणारी ती पहिली अभिनेत्री ठरली. नौशाद यांचे संगीत असणार्या बैजू बावरातील तिची गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. त्यानंतर बर्याच चित्रपटात तिने उल्लेखनीय भूमिका साकारल्या. मात्र पाकिजातील तिची भूमिका आजही आदर्श मानली जाते. अशी भूमिका साकारण्याची आपली इच्छा असल्याचे सगळ्याच नवोदीत अभिनेत्री त्यांच्या मुलाखतीत सांगत असतात.
|