निर्माती : दीप्ती श्रेयस तळपदे दिग्दर्शक : राजीव पाटील संगीत : अवधुते गुप्ते कलाकार : शिल्पा तुळसकर, तुषार दळवी, सुबोध भावे व संतोष जुवेकर, सई ताम्हनकर, श्रेयस तळपदे, शंतनू, मृण्मयी कोलवालकर, चिन्मय मांडलेकर, उर्मिला निंबाळकर, अभ्यंग कुवळेकर, श्रुती मराठे, जयादित्य गिरी व अनिता केळकर
वयात आलेल्या मुला-मुलींच्या दृष्टीने लग्न हा पूर्वीपासून महत्वाचा विषय राहिलेला आहे. विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच महत्वाचा विषय असतो. अटी-अपेक्षांच्या निबीड अरण्यातून आणि परंपरेच्या पहा-यातून स्वतःच्या मुलीला पुढे नेत आई-वडिलांना लग्नाचे सनई-चौघडे वाजवायचे असतात. अशात आणखी एखादी अनपेक्षित धोंड वाटेत असेल तर...
सईच्या लग्नाची जबाबदारी तिच्या बहिणीने, उर्मीने व तिच्या नव-याने, श्रीकांतने स्वीकारलेली आहे. तशी अट घालूनच सईच्या आईने प्राण सोडलेले आहेत. सुरुवातीला काही कांदेपोह्यांचे कार्यक्रम झाल्यानंतर सई या प्रकाराला विटते. बहीण, तिचा नवरा हे दोघेही कंटाळतात. कांदेपोहे डाट काम या ‘अती आधुनिक’ विवाह नोंदणी संस्थेची माहिती त्यांना कळते. सईचं नाव तिथे नोंदवलं जातं. विविध जोड्यांना एकमेकांच्या ओळखी करवून देऊन, आपापसात अनेकदा भेटायला लावून, खेळ खेळायला लावून ‘शक्य’ उमेदवार सुचवण्याचं काम ही संस्था करत असते.
एखादी ओळख-सहल आयोजित करण्याची त्यांची पध्दत असते. लग्न जमवण्याची टक्केवारी शंभर आहे, असा उमदा संचालक राहुलचा दावा असतो. संस्था सईसह दहा जणांची नावे ओळख-सहलीसाठी जाहीर करते. सईसाठी आदित्य हा उमेदवार सुचवला जातो. आदित्यलाही सई आवडू लागलेली असते. त्या सहलीतला शेवटचा भाग असा असतो: स्वतःच्या आयुष्यातील गुपिते आपल्या शक्य जोडीदाराला सांगायची...
सई तिचं गुपित आदित्यला सांगते आणि ते गुपित काय, हे चित्रचतुर प्रेक्षकांना सांगण्याची गरज नाही. आदित्यची त्यावर प्रतिक्रिया कशी येते, राहुल या एकूण प्रकरणात कसा गुंतत जातो हे चित्रपटातच पाहण्यासारखे आहे.
बहीण, बहिणीचा नवरा, संचालक व आदित्य या भूमिकांमध्ये अनुक्रमे शिल्पा तुळसकर, तुषार दळवी, सुबोध भावे व संतोष जुवेकर यांनी बाजी मारलेली आहेच. सई ताम्हनकरने केलेली सईची भूमिका तर व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देणारी आहे. तिने केलेलं काम पाहण्यासारखं आहे. श्रेयस तळपदेनं स्वतःची भूमिका सफाईदारपणे अदा केलेली आहे. शंतनू, मृण्मयी कोलवालकर, चिन्मय मांडलेकर, उर्मिला निंबाळकर, अभ्यंग कुवळेकर, श्रुती मराठे, जयादित्य गिरी व अनिता केळकर यांनी छोट्या भूमिका चोख बजावल्या आहेत.
लग्न जमवण्याची पध्दत, मुला-मुलींच्या अपेक्षा, त्यांच्या आई-वडिलांचे दृष्टिकोन या सगळ्यावर चित्रपटात एक झकास कोपरखळीच मारलेली आहे. पण कथानक तेवढेच मर्यादित नाही. कोपरखळी मारता मारता चित्रपट कुमारी मातेचा प्रश्न हळूच, नकळत हाताळतो. संजय पवारांच्या संवादांचा कल कथानकाला पुढे नेण्यापेक्षा चर्चा घडवून आणण्याकडे अधिक आहे आणि बोचरं सत्य सांगणारे ते संवाद ऐकण्यासारखे आहेत. अफेअर्स काय आजकाल सर्दीपडशांसारखी झालेली आहेत. येतात आणि जातात...एक मासला. संततीनियमन या विषयाशी संबंधित संवाद सरळ सरळ लिहिलेले आहेत, ही मराठीच्या दृष्टीने साहसी घटना.
उच्च निर्मितीमूल्ये चित्रपटाला प्रेक्षणीय बनवण्यात महत्वाचा वाटा उचलतात. अवधुते गुप्तेचं संगीत तरूण पिढीच्या या विषयाशी सुसंगत आहे. संगणक बंद होण्यापूर्वी विंडोजचाही बंद होतानाचा आवाज येतो. हा आवाज आवर्जून ऐकवला आहे, हे नमूद करण्यासारखे.
सई-आदित्यचा लग्नाचा मुद्दा वाहिन्यांपर्यंत नेण्याचा आणि पर्यायाने समाजात खळबळ उडविण्याचा भाग नसता तरी चालले असते. रत्नागिरीसाऱख्या ठिकाणची पार्श्वभूमी असलेली मुलगी काही वावगं वागू शकेल का, अशी शंका घ्यायला जागा आहे. शिवाय, सई आदित्यला गुपित सांगते पण ते बहीण व तिच्या नव-याला माहीत नसतं. सई व तिची आई, दोघींपैकी कोणीही ते या दोघांना सांगत नाही, हे खटकतं.
राजीव पाटीलचा वेगळा विषय घेण्याचा हा आणखी एक प्रयत्न अभिनंदन करण्याचा पात्रतेचा आहे. सनई-चौघडे च्या निमित्ताने मराठीतल्या नवनव्या विषयांच्या लाटेत आणखी एका दमदार कलाकृतीची भर पडलेली आहे.
फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.....
|