मन्या नावाचा एक चोर 'चुकून' एका महाविद्यालयात येतो आणि तेथील पोरांना सुधारवतो, महाविद्यालयाला आर्थिक संकटातून बाहेर काढतो आणि स्वतःही सुधारतो, ही या चित्रपटाची एक रेषा. (म्हणजे आजच्या भाषेत वन लायनर) आणखी काही लाईन्स घ्यायच्या असतील तर त्याच्यासारखा दिसणारा प्राध्यापक मनोहर दीक्षित तुरूंगात जातो आणि पुस्तकी जीवनाबाहेरचेही काही धडे गिरवतो. मन्या सुधारतो. साईड बाय साईड त्याची प्रेयसीही सुधारते. अविवाहित प्राध्यापकांना कोणी नायिका चित्रपटाच्या शेवटी चित्रपटात असूनही मिळत नाही, (धक्का पचवा.) ही एक लाईन घ्यायची असेल तर घेऊ शकता.मन्याच्या भूमिकेत मकरंद अनासपुरेने चांगले रंग भरले आहेत. प्राध्यापक ही दुसरी भूमिका मात्र तेवढी ठसठशीत होत नाही. दोन्ही व्यक्तिरेखा जुळ्या नाहीत. असे असेल तर चेहरेपट्टी, लकबी यांच्यात तफावत असायला हवी.(कमल हसनने अप्पू राजामध्ये या बाबीत जाणीवपूर्वक लक्ष घातले आहे. अप्पूचे दात अस्वच्छ ठेवले आहेत.) महाविद्यालयाबद्दल आस्था असणारी प्रमुख म्हणून स्मिता शेवाळेने चांगले काम केले आहे. मोहन जोशी यांचा गुंड परिचयाचा. (भोवताली रामी रेड्डी, शक्ती कपूर नाहीत इतकाच फरक.) दीपाली भागवतने मन्याच्या प्रेयसीचे कामही ठसठशीतपणे केले आहे. विजय गोखले, किशोरी अंबिये, निरंजन जोशी, वृषसेन दाभोळकर यांनी प्राध्यापक व विद्यार्थी चांगले उभे केले आहेत. अभिराम भडकमकर यांची कथा व त्यांचेच संवाद आहेत. मिलिंद लेले यांनी आधीचे दोन चित्रपट निर्माता म्हणून काढले होते. ही त्यांची दिग्दर्शक म्हणून पहिलीच कलाकृती आहे. चित्रपट बाळबोध वळणाचा असला तरी दोन घटका चांगल्या जातात. |