आर्थिक मंदीच्या विळख्यात भारत आणि चीन हे सर्वाधिक विकास दर असणारे देशही आता सापडल्याचे स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) 2009 या वर्षात या दोन देशांचा आर्थिक विकास दर घसरून अनुक्रमे 5 व 6.75 टक्के होणार असल्याचा अंदाज जाहीर केला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरचा उभय देशांच्या विकास दराने पहिल्यांदाच एवढी नीचांकी पातळी गाठलेली असेल.
आता जागतिक अर्थव्यवस्था एका आभासी थांब्यापाशी आली आहे, असे मत नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ ऑलिव्हर ब्लॅंचार्ड यांनी व्यक्त केले. ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्टची सुधारीत आवृत्ती आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर दृष्टीक्षेप अहवालाचे प्रकाशन बुधवारी झाले. त्यावेळी ब्लॅंचार्ड बोलत होते.
या अहवालातील अनेक बाबी धक्कादायक आहेत. आर्थिक मंदी जागतिक पातळीवर पसरल्याने या वर्षात जगाचा विकासदरच .5 टक्के एवढा खाली येणार आहे. गेल्या साठ वर्षातील हा नीचांकी आकडा असेल. जागतिक अर्थव्यवस्था याही वर्षी प्रचंड दबावाखाली असेल आणि पुढे स्थिती आणखी वाईट होईल, असे भविष्यही वर्तविण्यात आले आहे.
जगातील प्रगत देशांना तर या मंदीचा मोठा फटका बसणार आहे. अमेरिकेचा विकासदर 1.5, युरोपचा 2 तर जपानचा 2.5 टक्के असा विकासदर रहाण्याची शक्यता आहे. विकसनशील देशही यातून सुटणार नाहीत. भारत आणि चीनचा विकास दर अनुक्रमे 5.1 व 6.75 पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार हा आकडा 1.2 टक्क्याने कमी आहे. मात्र, 2010 मध्ये भारताचा विकासदर 6.5 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे.
जागतिक विकास दर 2010 मध्ये तीन टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. |