लिट्टेचा उदय-अस्त

लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलमचा जन्मदाता वेलुपिल्लई प्रभाकरन अखेर संपला. जगभरात दहशतवादी म्हणून ओळखला जाणारा हा क्रुरकर्मा श्रीलंकेतील तमिळींसाठी मात्र स्वातंत्र्ययोद्धाच होता. पण त्याला स्वातंत्र्य तरी का हवं होतं? हा संघर्ष त्याने का उभारला होता? त्यासाठी थोडं इतिहासात डोकवावं लागेल.....श्रीलंकेत सुरू असलेल्या तमिळी विरूद्ध सिंहली या गृहयुद्धाला 26 वर्षांचा इतिहास आहे. बहुसंख्य सिंहलींकडून अल्पसंख्य तमिळींवर होणारा अन्याय आणि त्यातून निर्माण झालेल्या दीर्घ संघर्षातूनच वेलुपिल्लई प्रभाकरन आणि त्याच्या लिट्टेचा जन्म झाला. त्याने स्वीकारलेल्या मार्गाविषयी मतभेद असू शकतील, पण श्रीलंकेतील तमिळींच्या अस्मितेला फुंकर घालत त्यानेच वेगळ्या तमिळ राष्ट्राचे स्वप्न दाखविले त्यासाठी सातत्यपूर्ण संघर्षही केला. लिट्टेच्या उभारणीची पार्श्वभूमी ब्रिटिशांनी 1948 मध्ये श्रीलंकेला स्वातंत्र्य दिले खरे, पण त्यानंतर सिंहली आणि तमिळी अशी फूटही त्यानंतर पडली. स्वातंत्र्यानंतर तेथे लागू करण्यात आलेल्या नागरिकत्वाच्या कायद्यापासून या संघर्षास सुरूवात झाली. 1956 साली सरकारने देशातील बहुसंख्यकांच्या सिंहलीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला. भाषक संघर्षाची बीजे पेरली जाऊन श्रीलंकेत 1958 च्या सुमारास पहिल्यांदा तमिळविरोधी दंगल घडली. त्यात शेकडो लोक ठार झाले. अनेक तमिळींना घरे सोडून दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला. सरकारनेही तेथील तमिळींची मुस्कटदाबी करताना बहुसंख्य सिंहली समुदायाला देशाच्या पूर्व प्रांतात स्थायिक केले. ही जागा परंपरागतरित्या तमिळींची मातृभूमी समजली जात होती. येथून संघर्ष अधिकच तीव्र झाला.तमिळींची मुस्कटदाबीसत्तरच्या दशकात भारतातून श्रीलंकेत जाणार्या तमिळ पुस्तकांवर, वृत्तपत्रांवर आणि तमिलनाडूतील राजकीय पक्षांच्या श्रीलंकेतील संघटनांवरही बंदी आणली गेली. तमिळ विद्यार्थ्यांना भारतात येऊन शिक्षण घेण्यावरही निर्बंध घालण्यात आले. 1972 च्या सुमारास तत्कालीन सीलोनचे नाव बदलून श्रीलंका ठेवण्याचा आणि बौद्ध हा राष्ट्रीय धर्म जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तमिळींच्या नाराजीत भर पडली. सरकारमध्ये असलेले सिंहलींचे वर्चस्व आणि तमिळींना मिळणारी दुय्यम वागणूक यामुळे 1973 च्या सुमारास स्वतंत्र तमिळ राष्ट्राची मागणी समोर आली. त्यावेळच्या तमिळ राष्ट्रवादी पार्टीने इतर तमिळ पक्षांना सोबत घेऊन तमिळ युनायटेड लिबरेशन फ्रंटची उभारणी केली. त्यानंतर ही मागणी जोर धरू लागली आणि त्यासाठी संघर्ष वाढू लागला. प्रभाकरनचा उदय या पार्श्वभूमीवर ईशान्य श्रीलंकेच्या पूर्वोत्तर भागातील एका छोट्याशा गावातील वेलुपिल्लई प्रभाकरन नावाच्या तरुणाचा उदय झाला. आपल्या साथीदारांमध्ये थंबी (लहान भाऊ) या नावाने परिचित असलेल्या प्रभाकरनने 1972 मध्ये स्वतंत्र तमिळ राष्ट्रासाठी 'तमिळ न्यू टायगर'ची स्थापना केली. प्रभाकरनच त्याचा नेता होता. सिंहलींविरोधात सशस्त्र लढा हे त्यांचे उद्दिष्ट्य होते. 1975 मध्ये या संघटनेचे नाव बदलून 'लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम' (लिट्टे) असे करण्यात आले. नंतरच्या काळात काही साथीदारांना सैन्याने ठार केल्याच्या निषेधार्थ या गटाने सिंहलींवर हल्ले सुरू केले. नेपोलियन व अलेक्झांडर यांना आदर्श मानणार्या प्रभाकरनवर सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्या विचारांचाही प्रभाव होता. विशेषतः जपान व जर्मनीच्या मदतीने सुभाषबाबूंनी इंग्रज सत्तेशी लढा त्याला फारच भावला होता. सुरवातीच्या काळात तमिळींवरील अन्याय दूर करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली ही संघटना नंतरच्या काळात अधिक हिंसक आणि क्रुर झाली.