भाजपमधील 'महाभारत'

'
मजबूत नेता आणि निर्णायक सरकार' चा नारा देत दिल्लीकडे आगेकूच करणार्या भाजपला कॉंग्रेस आघाडीने दिल्लीच्या आसपासही फिरकू न दिल्याने समस्त भाजपेयी आता बिथरले आहेत. या अपयशाचे खापर एकमेकांवर फोडून पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आणण्याची कोणतीही संधी सोडली जात नाहीये आणि या पक्षाचे 'लोहपुरूष' 'कुमकुवतपणा' दाखवत यातल्या एकाही असंतुष्टाला गप्प बसवू शकलेले नाहीत. थोडक्यात भाजपमधली 'निर्नायकी' या निमित्ताने पुढे येते आहे. पण हे फक्त भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील चित्र आहे, असे नाही. वाजपेयींनी तीन वेळा भाजपला सत्ता मिळवून दिली. पण या निवडणुकीत त्यांनी निवृत्ती स्वीकारली नि सगळी धुरा अडवानींकडे आली. पंतप्रधानपदासाठी आसुसलेल्या अडवानींनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना गप्प बसवून निवडणूक पार पाडली. पण सत्ता न आल्याने या विरोधकांनाही तोंड फुटली आहेत. त्यामुळेच पक्षातच 'महाभारत' सुरू झाले आहे. या महाभारतात पक्षातील नेते एकमेकांचे वस्त्रहरण करण्यात व्यस्त आहेत.हे वस्त्रहरण रोखण्याचे काम 'कृष्ण' बनून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला करावे लागत आहे. जसवंतसिंहांसारख्या नेत्यांनी संघाच्या हिंदूत्ववादी विचारसरणीने चालल्यामुळेच ही वेळ ओढविल्याचे विधान केल्यानंतर संघीय नेत्यांचाही संताप आवरला नाही. त्यांनीही 'मग भाजपने हिंदूत्व सोडावे' असा जाहीर सल्ला दिला आहे. अडवानींना आता कुणीही विचारत नसल्याने आणि राजनाथसिंहांचा काही प्रभावच पडत नसल्याने पक्षात 'निर्नायकी' माजली आहे. निवडणूक सुरू असतानाच सुधांशू मित्तल यांच्या नेमणुकीवरून अरूण जेटली आणि राजनाथसिह समोरासमोर आले होते. विशेष म्हणजे हे जेटली या निवडणुकीत मुख्य स्ट्रॅटेजिस्ट होते. त्यांच्या स्ट्रॅटेजी पार अपयशी ठरल्या. पण तरीही याचे 'बक्षिस' म्हणून त्यांना राज्यसभेचे नेतेपद देण्यात आले. दुसर्या प्रभावहीन नेत्या सुषमा स्वराज यांना लोकसभेत उपनेते करण्यात आले. यापूर्वी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते असलेल्या जसवंत सिंह यांना वळचणीत फेकण्यात आले. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हाही अडगळीत जाऊन पडले. मुरलीमनोहर जोशी या अडवानी विरोधक नेत्याचाही काही पत्ता लागत नाही. या उपेक्षेमुळे ही नाराज मंडळी आता तोंड उघडू लागली आहेत. सुरवात जसवंतसिंहांनी थेट अडवानींवर तोफ डागून गेली. त्यानंतर यशवंत सिंन्हा यांनी पक्षाध्यक्षांना पाठलेला 'नाराजीनामा' प्रसारमाध्यमांकडेही पाठवून ही नाराजी जगजाहिर केली. आता जेटलींनीही सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे जेटलींनी राजीनामा दिल्यानंतर राजनाथसिंहांनी सहा दिवस तो दडवून ठेवला होता. जसवंतसिंह, यशवंत सिन्हा यांनी जेटलींवर टीका केल्यानंतर राजनाथसिंहांनी तो माध्यमांपुढे आणला. दोन ज्येष्ठ नेत्यांच्या टीकेनंतर जेटलींनी राजीनामा दिल्याचे चित्र निर्माण करण्यात राजनाथसिंह यशस्वी ठरले. खुद्द पक्षाध्यक्षच अशा राजकारणात अडकले हे दुर्देवच. संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा:
भारतीय जनता पक्ष, पार्टी भाजपा, नितिन फलटणकर, अटल बिहारी वायजपेयी, भाजपेयी, बीजेपी, संघ, जेटली, अडवाणी, लालकृष्ण अडवाणी, नेते, नेतृत्त्व, कृष्ण, महाभारत, रामायण, राम मंदीर, जसवंत सिंह, यशवंत सिंन्हा