| | महाराष्ट्र थोर: आणिक कैसे थोर: जेणुका अर्थी आपुली थोरी असे: तेतुलाही अर्थी आणिकासी थोरी करी: थोरापासौनि महाथोर तयाते महाराष्ट्र म्हणिजे |
| |
मराठी साहित्य निर्मितीस प्रारंभ झाला तो सामान्यत: दहाव्या अकराव्या शतकात व तो प्रामुख्याने केला महानुभाव पंथीयांनी. त्यांनी मराठीचा उपयोग संस्कृतच्या जागी करण्यास प्रारंभ केला व काही काळ तरी संस्कृत-निष्ठांना चांगलाच शह दिला. पण त्या पंथाच्या विचित्र व सर्वसामान्यांच्या पूर्वापार धारणा-विचारांना धक्का देणार्या, अपरिचित तत्त्वज्ञानामुळे त्यांना आपले पंथीय तत्त्वज्ञानप्रचाराचे कार्य गुप्तपणे, अनेक सांकेतिक लिप्यातून करावे लागले. यामुळे मराठी माध्यमाच्या द्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या मूळ हेतूस सहजच बाधा येऊन खंड पडला. त्यांचे सर्व मराठी साहित्य त्या पंथीयांपुरतेच मर्यादित राहिले. मराठीचा यथावश्यक परिचय होणे मागे पडले. अलिकडेच ते सांकेतिक लिप्यांच्या कडीकुलुपातून मुक्त झाले आणि त्यावेळीच त्याचे अलौकिकत्व, महत्त्व लक्षात आले. चक्रधर हे त्या पंथाचे संस्थापक. त्यांनी महाराष्ट्रासंबंधी अभिमानाने म्हटले ते ज्ञात आहे.
महाराष्ट्री असताची योग्यता महाराष्ट्र सात्त्विक... तेथचे जडचेतन पदार्थ तेही सात्त्विक: तेथ असता शारीर मानसिक कव्हणीची उपद्रव नुपजिति: आणिक देशी शारीर मानसिक उपद्रव उपजला असे तो महाराष्ट्री असता शमे: तेथचां अन्नोदकी शमे: तेथचां औषधी शमे: तेथचां वारा, झाडी, पावूस तेहि सात्त्विक: तेणे सकळ उपद्रव शमेती:
''महंत म्हणजे निर्दोष: आणि एकं देश निर्दोष होती: परी सगून नव्हेति: महाराष्ट्र निदोर्ष: आणि सगुन तेथ असता अनाचार करावयाची बुध्दि नुपजे: आन उपनली तर करू ल्हाइजे: आपण आनाचारू न करी: आणीकास करू न दीती: ते महाराष्ट्र धर्म सिध्दि जाए: ते माहाराष्ट्र: महंत म्हणिजे थोर: तर तेची थोरी कवणे कवणे अर्थे असे पा: ना: सात्त्विक हा एक: दुसरा सुखरूप: तिसरा इष्टकारक: चवथा निर्दोष: पांचवा सगुण: महाराष्ट्र थोर: आणिक कैसे थोर: जेणुका अर्थी आपुली थोरी असे: तेतुलाही अर्थी आणिकासी थोरी करी: थोरापासौनि महाथोर तयाते महाराष्ट्र म्हणिजे:...''
त्याच्यानंतर त्यांच्या नागदेवाचार्य, माहिंभट्ट ऊर्फ महिंद्रबास इत्यादी अनेक लहान मोठ्या शिष्यांनी संस्कृतच्या ऐवजी मराठीचा पुरस्कार करून आपल्या वाड्:मय निर्मितीसाठी तिचा सर्रास उपयोग केला आणि चक्रधरांनी सुरू केलेली पूर्व परंपरा अत्यंत कसोशीने व निष्ठापूर्वक पुढे चालविली. केशोबासारख्या संस्कृतप्रेमी पंडितांना पुन: पुन: संस्कृतमध्ये रचना करण्याची तीव्रतम इच्छा होई, पण तिला वेळीच बंधन घातले जाई. नागदेवाचार्यांनी केशोबास सुचविले.
| | नारोबा आपल्या 'ऋद्वीपुर वर्णनात' लिहितात, 'जेथची नांव तर्ही मराठी: परि षट्दर्शनातें दळवटी । प्रमेय धुंडाळिता सृष्टी । आथीचिना ।।' 'सह्याद्रिवर्णनात' हिरांबा म्हणते 'जेथ परा चकितु झाली।। तेथ महाराष्ट्रीचा काइसी केली। परी माझी वाचा वालमैली'. |
| |
''नको गा केशवद्या: येणे माझीये स्वामीचा म्हातारिया सामान्य परिवारू नागवैल कीं: परमेश्वरे तरी जीवाचेया संकोचता आन अनेक वासना अयोग्यता जाणौनि आन काठिन्यता चुकवौति सकळासि अल्पायासे ब्रम्हविद्याचियां ठाये निवसितां येवौनि परमात्म लाभुद्यमां वावु होआवा म्हणौनीच महाराष्ट्रीये निरौपिले कीं गा: एरव्ही सर्वज्ञा काई देववाणी निरोपू न लाहे की गा: म्हणौनि केशवा संस्कृत सूत्रबध्द प्रकरण न करी तू कीं:. चुकून केशोवासांनी संस्कृत पारिभाषिक संज्ञा उपयोजिल्या. तर नागदेवांची कडक सूचना, पंडित केशवदेया: तुमचा अस्मात् कस्मात् नेणो: मज चक्रधरें निरोपिली मर्हाटी तियाचि पुसा: मग केशोबास संस्कृत बंद न करितीची:'', -ह्या मागील भावना, लोककल्याणाची कळकळ तसेच मातृभाषेवरिल प्रेमही स्पष्ट होते.
लोककल्याणाच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन चक्रधरांनी ज्या मायमराठीचा पुरस्कार केला, तिचाच उपयोग इतर महानुभाव लेखकांनीही तितक्याच प्रेमोदराने, श्रध्दानिष्ठेने, आत्मविश्वासपूर्वक करावा यात आश्चर्य कसले? दामोदर पंडित आपल्या 'वच्छहरण' या काव्याचा प्रारंभ करतांना म्हणतात, 'नागरी बोलीं स्छल वाणिजे: सकल रसांते पोखिजे' व हिच्या साह्याने 'उपमा श्लेष वर्णुक: एहीं रंजॐ सकलैक लोक.' 'प्राकृत जन मानवती' तशीच कथासंगती मी करीन: 'रूक्मिणी सैंवर'कर्ता नरेंद्रकवि तर स्पष्टच म्हणतो, 'हे पुण्य पावन मराठी । आइकती आदरें कर्णपुटी । तैयासी कवन्ही न पडे कामाठी । संसाराची।।' नारोबा आपल्या 'ऋद्वीपुर वर्णनात' लिहितात, 'जेथची नांव तर्ही मराठी: परि षट्दर्शनातें दळवटी । प्रमेय धुंडाळिता सृष्टी । आथीचिना ।।' 'सह्याद्रिवर्णनात' हिरांबा म्हणते 'जेथ परा चकितु झाली।। तेथ महाराष्ट्रीचा काइसी केली। परी माझी वाचा वालमैली'. प्रसिध्द भास्कर कवि आपल्या 'शिशुपाळवधात' म्हणतात, 'साहित्याचिया खेडकुळिया। सुदेशां बोलाचियां चिपुलियां। सिंपने खेळती सांवळीयां। रसवृत्ति।। फुन वाचां रसाळा। गर्व सांडवीण कोकिळां।' काशीराजाने 'द्रौपदी सैंवरात' व्यक्तविलेली श्रध्दा पहा. तो म्हणतो. 'मर्हाटी टिका देशभाषा मर्हाटी। मर्हाटी कुळी जन्म वानी मर्हाटी। गुरूग्रंथ हा सेविला म्या मर्हाटी:।।'
याप्रमाणेच अनेक महानुभावीय लेखकांनी मराठीच्या प्रशंसापर अभिमानाचे उद्गार वेळोवेळी व जागोजागी काढले आहेत. वरील दिलेल्या काही उतार्यांवरून इतरांबद्दल सहज कल्पना येऊ शकेल.
मुकुंदराज व ज्ञानेश्वर या सर्वमान्य आद्य मराठी कवींनी मराठीची वैशिष्ठ्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना मुकुंदराज, 'देशी हो कां मर्हाटी। परि उपनिषदाचीच राहाटी। तरी हा अथु जीवाचिया गांठी। कां न बांधावा?' (मुकुंदराज) 'मर्हाटिहेचां नगरीं। ब्रम्हविद्येचा सुकाळूकरी। घेणे देणे सुखाच वेर्ही। हो देई जगा। माझा मर्हाटाचि बोलू कवतिके। परि अमृतातेही पैजेसिं जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके। मेळविन।।' (ज्ञानेश्वर)
| | शिवछत्रपतीच्या काळात मराठीत शिरलेला फारशीपणा काठून तिला संस्कृतनिष्ठ रूप देण्यात आले व त्यासाठी 'राजव्यवहार कोष' तयार करविला गेला. पण त्यामुळे पेशवे काळात भाषेतील मराठीपणाच जाऊन हळूहळू संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित होऊ लागले. |
| |
अशा प्रकारे त्यांनी संस्कृतातील उच्च प्रकारचे साहित्य, नित्याच्या व्यवहाराच्या भाषेत मराठीत निर्माण करून स्त्रीशूद्रांसह आबाल वृध्दांना सुलभ केले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून नंतरच्या अनेक लहानमोठ्या साहित्यिकांनी संस्कृतची जोडीतोडीची व प्रसंगी तिच्याहूनही वरचढ अशी करून प्रत्यक्ष संस्कृत पंडितांकडूनही सन्मान मिळवला. एकनाथपंडितांनी प्रत्यक्ष काशीक्षेत्री मराठी 'भागवत' लिहून हत्तीवरून मिरवणूक काढण्याइतपत सन्मान मिळविला. वामनपंडितांना मराठीत रचना केल्यामुळे प्रत्यक्ष मुलाचा विरोध पत्करावा लागला. पण या लोकांची निष्ठाच जबर. आपल्या मातृभाषेवरील प्रेम वरवरचे, दिखाऊ किंवा ओढून ताणून आणलेले नसून आंतरिक, खरे होते. स्वयंभू होते. म्हणून संस्कृतपंडित किंवा नवीन मुसलमानी राजवट आल्यामुळे फारशीकडून वेळोवेळी झालेले हल्ले त्यांनी मोठ्या धैर्याने, जोमाने परतवून स्वभाषा टिकवली. श्री एकनाथ, वामनपंडित, मुक्तश्वर, दासोपंत, श्रीधर, मोरोपंत, तुकाराम, रामदास, इत्यादि जेष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक आणि त्यांच्याच बरोबर इतर अनेक लहान मोठ्या कवींनी मायबोलीवरील निस्सिम, तीव्रतम प्रेमापोटी लक्षावधी अभंगांदीची प्रचंड रचना मराठीत केली व मोठ्या आत्मविश्वासपूर्वक संकटाला तोंड देऊन त्याचा प्रतिकार, परिहार केला.
शिवछत्रपतीच्या काळात मराठीत शिरलेला फारशीपणा काठून तिला संस्कृतनिष्ठ रूप देण्यात आले व त्यासाठी 'राजव्यवहार कोष' तयार करविला गेला. पण त्यामुळे पेशवे काळात भाषेतील मराठीपणाच जाऊन हळूहळू संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित होऊ लागले. या सर्व प्रसंगी कोणी संस्कृतशी समन्वय करण्याचा तर कोणी तिच्यावर टीकेचा मारा करून मराठीचे श्रेष्ठत्त्व पटविण्याचा, तर एखाद्या एकनाथसारख्या फटकळाने 'संस्कृत देवे निर्मिली', प्राकृत काय चोरापासूनी आली?' असला रोखठोक प्रश्नही विचारला. ते म्हणतात, ' देवासी नाही वाचाभिमान'. दासोपंत त्यापुढे एक पायरी जाऊन असा व्यर्थ संस्कृताभिमान बाळगणार्यांची कींव येऊन अशा 'मुर्खाशी किती मुंडणे' अशा शब्दात संभावना करतात तर, संतोषमुनि कृष्णदास संस्कृतपेक्षा मराठी श्रेष्ठ कां हे सांगतांना संस्कृतचा थोडा उपहास करीत म्हणतो, 'महाराष्ट्री स्त्रीलिंग वाक्य आणि संस्कृत तव नपुंसक'. मोरोपंतानी मराठीत प्रचण्ड निर्मिती केली तरी तसे करण्याची त्यांची कारणमीमांसा संस्कृतला अनुकूल स्वरूपाची दिसते. 'गीर्वाण शब्द पुष्कळ जनपदभाषाचि देखता थोडी। आहे, गुणज्ञ लोकी याची घ्यावी हळूहळू गोडी'. (मराठी शब्द समृध्द नाहीत तेव्हा पंडितांनी तिचे हळूहळू सेवन करावे म्हणजे ती संस्कृतच्या सहवासाने शब्द समृध्दि मिळवू शकेल) असे ते म्हणतात. हा भाव दासोपंतांची उपरोक्त आत्यंतिक प्रवृत्ति सोडली तरी त्यांनीच लिहीलेले पुढील विचारही लक्षणीय आहेत.
|