पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफांनी माजी लष्करप्रमुख म्हणून आपण संरक्षणात्मक व आणीबाणीच्या परिस्थितीत उपयुक्त डावपेंचांनी सिद्ध असल्याचे स्पष्ट करून आपणास अटकेची भीती नसल्याचे रोखठोक वक्तव्य केले आहे.
त्यांना कथितरीत्या अटक करण्याच्या वृत्तावर कठोर वक्तव्य करताना देशहिताचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सक्षम असल्याचे स्पष्ट केले. निर्णायक परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी आपणाकडे योजना तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
देशास कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी राजकीय पक्षांसोबतच आपलीही भूमिका महत्त्वाची असल्याने देश सोडून जाण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशात सद्भावनेचे राजकारण केल्यास राजकीय स्थैर्य आताही शक्य आहे. सत्ताधारी आघाडी सरकारने पाच वर्षाचा कालखंड पूर्ण केल्यास आपणास आनंदच होईल असे स्पष्ट करून विद्वेषाचे राजकारणातून मुक्त होऊन भविष्यातील आव्हानांकडे लक्ष केंद्रित करून सरकारने कार्य केल्यास मूळ प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला.
दहशतवाद, फूटीरवाद व आर्थिक अस्थैर्याचा व्यापार, उद्योगांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. लष्कराचा वापर, राजकीय चर्चा व आर्थिक पुनर्बांधणी या त्रिसूत्री समस्येवर तोडग्यासाठी परिणामकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
|