पाकिस्तानातील संघटनांकडून भारतात दहशतवादी हल्ला झाल्यास प्रत्युत्तरा दाखल पाकवर हल्ला केला जाईल या भारताच्या चेतावणीनंतर अमेरिकेने दोन्ही देशांनी वाद टाळून शांतता आणि सुरक्षेसाठी एकत्र काम करावे असे आवाहन केले आहे.
अमेरिकन उप संरक्षण मंत्री विल्यम्स जे. लिन यांनी याबाबत सांगितले, की दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करणे महत्वाचे आहे. दोन्ही देशांनी वाद टाळून एकमेकांबद्दलच्या विश्वासात अधिक दृढता आणण्याची गरज आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाक्युध्द सुरू असून भारताने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात चेतावणी दिली आहे, की जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तरात हल्ला करू. तर पाकने भारतावर तालिबानला पाठबळ देत असल्याचा आरोप केला आहे.