बिजींग ऑलिंपिक ज्योत काल रात्री उशीरा भारतात दाखल झाली आहे. आज दुपारनंतर ही ज्योत 2.3 किमी अंतर कापणार आहे.
तिबेटी नागरिकांचा विरोध पाहता आणि अनेक राजकीय, अभिनेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्योत धरण्यास नकार दिल्याने या ज्योतीपेक्षा नकाराच्या धुरानेच राजधानीतील वातावरण काळवंडले आहे.
जगभरात या ज्योतीचे स्वागत चीनविरोधी घोषणांनी आणि काळ्या झेंड्यांनी करण्यात आल्यानंतर आता भारतात या ज्योतीला आणखी एका ज्योतीशी स्पर्धा करावी लागणार आहे.
चीनचा निषेध करत तिबेटी नागरिक समांतर रॅली काढणार आहेत. ऑलिंपिकची ज्योत विजय पथावरून निघणार आहे, तर तिबेटींची ज्योत राजघाटावरून निघणार आहे. विजय पथावरून निघणार्या रॅलीत 69 धावपटू असतील आणि राजघाटावरून निघणार्या रॅलीत सुमारे 5000 हजार तिबेटी सहभागी होणार आहेत.
राजधानीत सध्या या दोनही ज्योतींची सुरक्षा सरकारने वाढवली असून, जणू लष्कर छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.या दोन ज्योतींच्या रक्षणार्थ सरकारने 15 हजार सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. तिकडे तिबेटमध्ये स्वातंत्र्याचे अग्निकुंड पेटलेले असताना या दोन ज्योतींच्या चटक्यांनी जगालाही तिथल्या संघर्षाची जाणीव करून दिली आहे.
|