भारतीय जनता पक्षाने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतवाढीविरूद्ध पुकारलेल्या राष्ट्रव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षकार्यकर्त्यांनी मानवी साखळ्या उभारण्यासोबतच शांततापूर्ण निदर्शने केली.
सार्वजनिक कार्यालये व वाहतूक सुरळीत सुरू राहल्याने आवश्यक सेवांचे संचलन समाधानकारक राहिले. काही ठिकाणी दगडफेकीच्या तुरळक घटना नोंदवल्या गेल्या. राजधानीत राजघाट येथे व्यापार्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्याने प्रमुख घाऊक बाजारपेठ व किरोकोळ बाजारपेठांमध्ये दुकाने बंद राहिली.
अखिल भारतीय व्यापारी संघटनेनुसार सुमारे पाच लाख व्यापार्यांनी बंद मध्ये सहभाग घेतला. भाजपशासीत गुजरात, राजस्थान, उत्तराखंड राज्यांमध्येही बंदला संमिश्र प्रतिसाद राहिला. पक्षकार्यकर्ते व पक्ष समर्थक संघटनांनी धरणे देऊन घोषणाबाजी करून केंद्रावर जीवनावश्यक वस्तूंची किंमतवाढ रोखण्यात अपयशी ठरल्याचा निषेध नोंदवला.
महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, नाशिक़, औरंगाबाद व पुणे येथे मानवी साखळ्या उभारून किंमतवाढीबाबत केंद्राचा निषेध नोंदवला. मात्र आसाम, हिमाचल प्रदेश, मणीपूर येथे दुकाने, बाजार, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहिल्याने सामान्य जीवन विस्कळीत झाले.
बिहार, जम्मू व काश्मीर, ओरिसा, व उत्तर प्रदेशात बंदला सामान्य प्रतिसाद मिळाला. दक्षिणेत केरळ, पॉंडिचेरी येथे सामान्य जनजीवनास बंदचा फटका बसला. मात्र तमिळनाडूत बंदचा कसलाही प्रभाव जाणवला नाही. कर्नाटकातही बंदला प्रतिसाद लाभला नाही.
|