अमरनाथ येथील वनजमीनीच्या हस्तांतरणावरून विश्व हिंदू परिषदेने पुकारलेल्या 'भारत बंद'ला देशभर हिंसक वळण लागले असून आंदोलकांनी पुन्हा एकदा एसटीच्या बसेसनाच 'लक्ष्य' केले आहे. बंदच्या पाश्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून महाराष्ट्रातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.
मुंबईतील घाटकोपर, ठाकूरद्वार, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि सांताक्रूझ येथे कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. राज्यभरातही किरकोळ अनेक ठिकाणी दगडफेक करून बसेसचे मोठया प्रमाणवर नुकसान करण्यात आले.
विहिंपने बंदचे आवाहन केल्यानंतर संघाचा गड समजल्या जाणा-या नागपूरमध्ये मंगळवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी 4 ते 5 बसेसच्या काचाही फोडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे येथे बससेवा बंद होती.
औरंगाबाद, नाशिकमधील रविवार कारंजे परिसर, कोल्हापूर, जळगाव, ठाणे, भिवंडी या शहरांमध्ये आंदोलकांनी बसेसवर दगडफेक केल्याने सरकारी मालमत्तेचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. तर सातारा, भंडारा व गोंदीया या शहरांमध्ये जोरदार दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
बेळगावमध्येही बंदला हिंसक वळण लागल. भाजपचे आमदार अभय पाटील यांनी कोर्ट रोडवर दुकानं बंद करायचा प्रयत्न केला, परंतु मुस्लिम युवकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याने दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. भंडारा येथेही जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
बंदमुळे सामान्य जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर पडलेल्यांची मोठया प्रमाणावर गैरसोय झाली आहे.
|