आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या ट्रक मालकांना केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी इशारा दिला असून, यामुळे जनतेचे हाल होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संपामुळे गेल्या तीन दिवसांपासून देशात हाहाकार माजला असल्याने हे आंदोलन जनतेच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर चिदंबरम यांनी पत्रकारांशी बोलताना ट्रक मालकांना हा इशारा दिला. सेवाकरात सवलत देण्याविषयी ट्रक मालकांशी चर्चा करण्यात आली असून, त्यांच्या इतर मागण्या राज्यांशी निगडित असल्याचे ते म्हणाले. |