देशातील चाळीस विद्यापीठे स्वायत्ततेचे निकष पूर्ण करत नसल्याने त्यांचा स्वायत्त दर्जा काढून घ्यावा अशी शिफारस मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नेमलेल्या एका उच्चस्तरीय समितीने केली आहे.
या समितीने केलेल्या अभ्यासात केवळ ३८ विद्यापीठे स्वायत्ततेचे निकष पाळत असल्याचे निदर्शनास आले. पण चाळीसहून अधिक विद्यापीठांनी या निकषांना हरताळ फासल्याचेही दिसून आले. ४४ विद्यापीठांमध्ये काही सुधारणा घडवून आणल्यास त्यांचा स्वायत्त दर्जा चालू ठेवण्यास हरकत नसल्याचे या समितीचे म्हणणे आहे.
प्रा. एम. अनंतकृष्णन, प्रा. मृणाल मिरी, प्रा. गोविंदन मेहता, प्रा. पी. एन. टंडन यांच्या समितीने हा अहवाल तयार केला. १२६ स्वायत्त विद्यापीठांच्या सादरीकरणाच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला.
यातील अनेक विद्यापीठात शिक्षकांची गुणवत्ता, सोयी सुविधा यांत अनेक कमतरता जाणवल्या. त्यामुळे या विद्यापीठांनी विशिष्ट कालमर्यादेत आपल्या गुणवत्तेत सुधारणा न केल्यास त्यांचा स्वायत्ततेचा दर्जा काढून घेऊन पुन्हा महाविद्यालयांचाच दर्जा द्यावा अशी शिफारस या समितीने केली आहे.