जयपूरच्या सीतापुरा औद्योगिक क्षेत्रातील इंडियन ऑईल डेपोला लागलेली आग 14 तास उलटल्यानंतही नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसत नसून या आगीत आतापर्यंत आतापर्यंत किमान 10 जणांचा मृत्यू तर 150 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
आगीमुळे डेपो परिसरातील पेट्रोल व डिझेलचे सुमारे 10 टँकर स्फोट होऊन उडाल्याने सुमारे 20 कि.मी.पर्यंतच्या क्षेत्रात भूकंपसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीवर नियंत्रणासाठी सैन्य दल आणि फायर ब्रिगेडचे जवान प्रयत्नशील असून मुंबई व मथुरा येथून तज्ज्ञांच्या पथकास पाचारण करण्यात आले आहे.
ताज्या माहितीनुसार डेपोला लागून असलेला पॉवर ग्रिडही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असून सकाळपासून आतापर्यंत पेट्रोल टाक्यांचे दोन-तीन स्फोट झाले आहेत. संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा यापूर्वीच रात्री खंडित करण्यात आला आहे.
इंडियन ऑईलच्या या डेपोजवळच भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमचाही डेपो असून या डेपोच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज आहे. तर आग लागलेल्या इंडियन ऑईल डेपोचा इतर डेपोशी पाईपलाइनने असलेला संपर्क खंडित करण्यात आला आहे.
मुख्य आगीच्या ठिकाणापर्यंत पोचणे अग्निशमन दलाला अद्यापही शक्य झालेले नाही. आगीमुळे संपूर्ण जयपूर शहरावर धुराचे लोट जमा झाले आहेत. आग लागताच परिसरातील सर्व कारखाने बंद करून तेथील कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. तर आसपासच्या क्षेत्रातील गावेही रिकामी करण्यात आली आहेत. या भागात अनेक शिक्षण संस्थांच्या इमारती आणि वसतीगृहे असून ती देखील रात्रीच रिकामी करण्यात आली आहे.
या डेपोत सुमारे 80 लाख लीटर पेट्रोलियम पदार्थ असून त्यावर नियंत्रण मिळवणे जवळ-जवळ अशक्य असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
पेट्रोलियम मंत्र्यांचा दौरा
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी शुक्रवारी सकाळी जयपूरला जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यासाठी एक समिती गठीत केली जाणार असल्याचे सांगितले. आगीवर नियंत्रणासाठी आणखी तेरा ते चौदा तास लागण्याची शक्यता अधिकृत सुत्रांनी व्यक्त केली आहे.
सहा कंटेनरमध्ये अजुनही आग
दरम्यान, इंडियन ऑइलकडून प्रसारित केलेल्या वृत्तानुसार पाइपलाइनमधून झालेल्या गळतीमुळे ही आग लागली आहे. या डेपोत 80 ते 90 लाख लीटर पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलचा साठा आहे. डेपोच्या 11 पैकी सहा कंटेनरमध्ये अजुनही आग भडकली असून त्यावर नियंत्रणासाठी दिल्ली, मुंबई आणि मथुरा येथील रिफाइनरीकडूनही मदत घेतली जात आहे.
शाळांना सुटी अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगीवर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन मदत करीत असून आगीचे तांडव पाहता एक किलोमीटर क्षेत्र रिकामे करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना सुटी घोषित केली आहे.
श्वसनास त्रास
आग आणि धुरामुळे परिसरात लोकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला असून अनेक जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी हा संपूर्ण परिसर 'डेंजर झोन' घोषित केला असून याबाबत उच्चतरीय बैठक बोलावली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 2-2 लाख रुपयांचील मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर सर्व रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. घटनास्थळावर सैन्याच्या दोन 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.