सुरक्षा दलांनी चालविलेल्या मोहिमेमुळे कोंडीत सापडलेल्या माओवाद्यांनी नमते धोरण स्वीकारत चर्चेची तयारी दाखवली आहे, पण त्यासाठीही काही अटी पुढे केल्या आहेत. निमलष्करी दले मागे घ्यावीत ही त्यातली प्रमुख मागणी आहे.
माओवादी नेता किशनजी याने ही चर्चेसाठी पुढाकार घेतला असून नक्षलग्रस्त आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरीसा, बिहार, झारखंड व पश्चिम बंगालमधील निमलष्करी दलांना मागे घ्यावे. आदिवासींना चांगली वागणूक द्यावी अशी मागणी केली आहे. शिवाय आदिवासींवर करण्यात आलेल्या सरकारी अत्याचारांबद्दल त्यांची माफी मागितली जावी, असेही किशनजी यांनी म्हटले आहे. आदिवासींपुढे येऊन ही माफी मागावी असेही त्यांनी म्हटले आहे. आदिवासींची मने जिंकण्यासाठी त्यांच्याशी होत असलेली वर्तणूक सुधारली पाहिजे, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी काल व्यक्त केले होते. त्यावर हे विधान म्हणजे डोळ्यात धूळ झोकण्याव्यतिरिक्त काहीही नाही, अशी प्रतिक्रिया किशनजी यांनी व्यक्त केली.