नवी दिल्ली, सोमवार, 23 नोव्हेंबर 2009( 11:32 IST )
PTI
बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी नेमण्यात आलेल्या न्या.लिबरहान आयोगाचा अहवाल सभागृहात सादर होण्यापूर्वीच एका वृत्तपत्रातून फुटला कसा असा सवाल करीत विरोधी पक्ष नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून हा अहवाल कुठलाही विलंब न करता आजच सभागृहात सादर केला जावा अशी मागणी केली आहे.
अडवाणी यांनी लोकसभेत सांगितले, की वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी करणे हे माझ्या जीवनाचे आणि पक्षाचे अंतिम ध्येय्य असून ते उभारले जाईलच. या प्रकरणाशी माझा संबंध असल्याचे समोर आले हा मी माझा बहुमान समजतो. मात्र त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव येणे हे चुकीचे असल्याचे म्हणतानाच.
सभागृहात लिबरहान आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वीच तो एखाद्या वृत्तपत्रातून प्रसिध्द केला जावा ही आश्चर्यजनक बाब असून त्यास सर्वस्वी गृहमंत्रालयच जबाबदार असल्याचा आरोप अडवाणी यांनी केला आहे.
अडवाणी यांनी आपण बाबरी पतन प्रकरणात सहभागी आहोत याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगून हिंदुत्वाच्या मुद्यावरून पक्षाला पुन्हा संजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.