राज्यात विजेच्या टंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत असून या संकटावर मात करण्यासाठी महावितरणने लोडशेडिंगच्या वेळेत वाढ केली असल्याची माहिती ऊर्जा मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे आता रोजच्या लोडशेडिंगमध्ये 1 ते 2 तासांची वाढ होणार आहे.
यंदा राज्यभर पावसाने ओढ दिल्याने विजेचे संकट आ वासून उभे राहिले असून त्यावर मात करण्यासाठी महावितरणने लोडशेडिंगमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत उर्जामंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले, की राज्यात रोजची 4500 मेगावॅट विजेचा तुटवडा जाणवतो आहे. यंदा पाऊसच न झाल्याने कोयना धरणातील वीज निर्मिती प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पातून रोज 1000 मेगावॅट वीज निर्मिती संध्या बंद आहे. तर दाभोळ प्रकल्पातून मिळणारी 900 मेगावॅट वीजही प्रकल्पात आलेल्या अडचणींमुळे मिळणे बंद झाले आहे. तर पावसाळ्याचा काळात काही सेट्स ओरालिंगसाठी काढली जात असल्यानेही टंचाई जाणवत आहे.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी मुंबई वगळता राज्यभर लोडशेडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोठ्या शहरांमध्ये होणारी 4 ते 6 तासांचे लोडशेडिंग 5 ते 6 तास करण्यात येणार आहे. तर लहान शहरांमध्ये 6 ते 8 तासांचे लोडशेडिंग 7 ते 9 तासांचे होईल. तर ग्रामीण भाग आता 12 तासांऐवजी 13 तास अंधारात राहणार आहे. ही स्थिती तात्पुरता राहणार असल्याचे ऊर्जा मंत्र्यांचे म्हणणे असले तरीही त्यात नंतर काही बदल होण्याची शक्यताच कमी असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
|