एरवी म.गांधी, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रीय नेत्यांनाही सोयीनुसार आपल्या पुरते वाटून घेणा-या पक्षांनी आता वडापाव, कांदेपोहे, उपमा यासारख्या खाद्यपदार्थांनाही वाटून घेण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेने वडापावच्या ग्लोबलायझेशनसाठी 'शिव वडापाव' सुरू केला आणि त्याला मराठी माणसाचा विशेषतः मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसताच आता कॉंग्रेसनेही खाद्यपदार्थांच्या या स्पर्धेत उडी घेतली आहे.
शिवसेनेच्या वडापाव संमेलनानंतर आता काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रीयन कांदे पोहे संमेलन भरविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी ही घोषणा केली असून लवकरच छत्रपती शिवाजी टर्मिनस समोरील आझाद मैदानावर हे संमेलन भरविले जाणार आहे. या संदर्भात त्यांनी कृपाशंकर सिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर या योजनेचा आराखडा मुखमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचे सांगितले आहे.
शिवसेनेच्या वडापावला शह देण्यासाठी हे महाराष्ट्रीयन कांदेपोहे सुरू केले जात असल्याचे स्पष्ट असल्याने आगामी काळात यावरून चांगलेच राजकारण रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. |