भारतीय घटनेची माहिती तळागाळापर्यंत पोचावी आणि त्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी दि. 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिवस' म्हणून पाळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या दिवशी राज्यातील गावागावात, तालुका व जिल्हास्तरावर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर या लोकशाही राष्ट्राला राज्यघटना असावी, यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची स्थापना करण्यात आली. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली 2 वर्षे 11 महिने 17 दिवसांच्या परिश्रमातून घटनेचा मसुदा तयार करण्यात आला. भारताची ही स्वतंत्र राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानिक सभेत अंगीकृत व अधिनियमित करून देशाने स्वत: प्रति अर्पित केली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ही घटना अंमलात आली.
या दिवसाची ओळख सर्वांनाच व्हावी यासाठी राज्य शासनाने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. |