महाराष्ट्राची 'देशमुखी' सांभाळणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना अभय देण्यास हायकमांडने नकार दिल्याने अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे आज दिला. मुंबईवरील हल्ल्यांप्रकरणी देशमुख टीकेचे लक्ष्य ठरले होते. त्यातच चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्माला घेऊन ते ताजची पहाणी करायला गेल्याने तर त्यांना मीडीयाने चांगलेच धोपटले होते.
या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनीही विलासरावांबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यातच केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील व राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही राजीनामा दिल्याने विलासरावांवर राजीनामा देण्याचे 'नैतिक' दडपण आले होते. अर्थात राजीनामा देताना त्यांनी मुंबईवरील हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, नवा मुख्यमंत्री पदाची सुत्रे स्वीकारेपर्यंत देशमुखच काळजीवाहू मुख्यमंत्री रहातील.
दरम्यान, यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की महाराष्ट्राच्या विकासासाठी मी चांगले काम केले आहे. यापुढेही करत राहीन. पक्षासाठीही यापुढे मी काम करत राहीन. त्यामुळे भविष्याची मला चिंता नाही.
महाराष्ट्रासाठी मी खूप काही केले नाही. या काळात माझ्यावर कुठलाही कलंक नाही, ही महत्त्वाची बाब असल्याचे ते म्हणाले. |