राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भय्यांविरूद्धचा आक्रमक पवित्रा कायम असताना उभय पक्षांतील संघर्ष मिटविण्यासाठी पुढाकार भय्यांनी घेतला आहे. येत्या मकरसंक्रांतीला उत्तर भारतीय सभेतर्फे मुंबईत ठिकठिकाणी मराठी भागात तीळगुळाचे वाटप करून कडू झालेले हे संबंध गोड करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. उत्तर भारतीय सभेचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मुंबईभर होर्डिंग्ज व बॅनर उभारण्यात येणार आहेत. त्यावर तीळगूळ घ्या गोड गोड बोला असे मराठीत लिहिण्यात येणार आहे. त्याद्वारे मराठी लोकांना आपल्याशी गोड बोलण्याचे आवाहन केले जाणार आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी तीळगूळ वाटप केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांत मराठी व उत्तर भारतीयांमधील संबंध बिघडले आहेत. ते सुधारण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलल्याचे निरूपम यांचे म्हणणे आहे. झाले गेले विसरून जाऊन संबंध गोड व्हावेत म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.मुंबई कुणाची? |