विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेने प्रसार माध्यमांना टार्गेट करण्यास सुरूवात केली असून आपल्या पराभवास माध्यमांची 'दामशास्त्री' भूमिकाच कारणीभूत असल्याचा आरोप सुरूच ठेवला आहे. 'आयबीएन-लोकमत' वरील हल्ल्याचे समर्थन करीत असलेल्या शिवसेनेवर सर्व थरातून टीका होत असताना आता शिवसेनेने सर्व प्रसारमाध्यमांना टीकेचे लक्ष्य केले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये या संदर्भात आपली भूमिका मांडताना शिवसेनेने आयबीएन-लोकमतवर झालेला हल्ला योग्य असल्याचे सांगून माध्यमे केवळ पैशांच्या बळावर कुणाही विरोधात वातावरण तयार करत असल्याची टीका केली आहे.
एखाद्याला नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलावा तसे माध्यमांनी शिवसेनेविरोधात काम सुरू केले आहे. विरोधकांकडून पैसे घेऊन एखाद्याची प्रचंड नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचे काम माध्यमांनी अंगीकारल्याने एकेकाळी रामशास्त्री असलेली ही परंपरा आता दामशास्त्री झाली असल्याचे यात म्हटले आहे.