एखादे शहर असे असू शकते काय, जेथे सत्ताधारी राजा रात्री थांबूच शकत नाही. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या सदरात यावेळी आम्ही आपल्याला अशाच एका शहरात घेऊन जाणार आहोत. येथे एखादी रात्र काढली तर आपले राज्यच खालसा होईल, अशी भीती एकेकाळी राजांना होती आणि आजकालच्या सत्ताधाऱ्यांना आजही ती आहे. उज्जैन असे या शहराचे नाव असून येथे एकच राजा आहे तो म्हणजे येथील ज्योतिर्लिंग महाकाल, अशी समजूत आहे.
अनभिषिक्त सम्राट असलेल्या महाकालेश्वराव्यतिरिक्त दुसर्या राजाने येथे रात्र काढली तर त्याने राजसत्ता गमावलीच म्हणून समजा, असे मानले जाते. उज्जैन हे शिंदे राजघराण्याच्या जहागिरीचा भाग होते. त्यांना राहण्यासाठी उज्जैनच्या सीमेबाहेर कालियादेह हा राजवाडा निर्माण केला होता.
राजा-महाराजांच्या काळात शिंदे घराण्याव्यतिरिक्त इतर राज्यातून येणारे राजे, मोठ्या पदावरील व्यक्तीही अवंतिकेत (उज्जैनचे जुने नांव) रात्री थांबायचे नाहीत. उज्जैनवर शिंदे घराण्याची राजसत्ता प्रस्थापित झाल्यापासून कोणत्याही राज्याने येथे रात्र काढली नसल्याचे सांगण्यात येते. शिंदे घराण्याचे राजे पहाटेच उज्जैन येथे येऊन महाकालचे दर्शन घेतल्यानंतर काम आटोपून रात्र होण्याअगोदरच उज्जैनच्या वेशीबाहेर पडायचे.
पण तरीही कामात अडथळे निर्माण होऊ लागल्याने उज्जैनच्या सीमेबाहेर कालियादेह राजवाडा बांधण्यात आला. सर्व सुखसोयींनीयुक्त राजवाड्यात पाण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. महालासमोरच जलकुंड आहे.
महालाच्या आतच सूर्यमंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. राजवाड्याच्या निर्मितीनंतर राजा दिवसभर उज्जैन येथे राजकार्य आटोपून दिवस मावळण्याअगोदर कालियादेह येथे परतायचे. स्वातंत्र्यानंतर राजे-रजवाडे इतिहासजमा झाले, मात्र आख्यायिका कायम राहिली. सद्यपरिस्थितीतही मोठ्या हुद्दयावरील अधिकारी व मंत्री उज्जैनमध्ये रात्री थांबत नाहीत.
|