मुख्य पृष्ठ > धर्म > हिंदू > तीर्थ-क्षेत्र
सुझाव/प्रतिक्रिया मित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'येवा सिंदुधुर्ग आपलाच असा'
पवन

कोकणची माणसं साधीभोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी

Sindhu durga
MH GovtMH GOVT
कोकणचे सार्थ शब्दात वर्णन केलेले हे गाणे सर्वांना परिचित आहेच. या कोकणातील अगदी दक्षिणेकडचा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न आहे. तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातून विभाजन होऊन 1 मे 1989 रोजी महाराष्ट्रदिनी या जिल्ह्याची निर्मिती झाली. येथील संस्कृती, निसर्ग, पर्यावरण जपण्यासाठी राज्य शासनाने 30 एप्रिल 1977 रोजी या जिल्ह्याला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा दिला. महाराष्ट्रातील हा एकमेव पर्यटन जिल्हा आहे.

रुपेरी स्वच्छ वाळूचे समुद्र किनारे, अंबोलीसारखे हिल स्टेशन, रांगणा-मनोहर मनसंतोष हे डोंगरी किल्ले, विजयदुर्ग -सिंधुदुर्ग- नियती हे जलदुर्ग, गिर्यारोहकांना साद घालणारे उत्तुंग सह्याद्रीचे कडे, वळणावळणाच्या अंबोली-फोंडा, गगनबावडा घाटातील खोल दर्‍या, घाट रस्ते, शांत जलाशय असलेली धामापूर, मुळेसारखी निवांत तळी, रम्य बोटींग करण्याची सोय असणाऱ्या खाड्या ही येथील भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत.

Sundha durga
MH GovtMH GOVT
याशिवाय वालवला, कुणकेश्वरासारखी प्रसिद्ध देवस्थाने आणि आंबा, फणस, काजू, जांभळे असा रानमेवा, शिवाय फणसवडी, आंबावडी, काजूवडी, भात, माशांचं कालवण, मालवणी मटण अशी चविष्ट खाद्यसंस्कृती ही देखिल येथील वैशिष्ट्ये आहेत. दशावतार, चित्रकथीसारख्या प्राचीन लोककला, सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी, माका-तुकाची मालवणी बोली अशा अगणित गोष्टींनी सिंधुदुर्ग समृद्ध आहे.

पूर्वेला सह्याद्रीचे उत्तुंग कडे, पश्चिमेला अथांग अरबी समुद्र आणि दक्षिणेला गोवा ही जिल्ह्याची भौगोलिक रचना आहे.या जिल्ह्यात यायचे असल्यास कोकण रेल्वे अजिबात टाळू नका. हा प्रवास तर संस्मरणीय आहे. धुक्यात हरवलेली कौलारू घरे पाहताना सिंधुदुर्गच्या प्रेमात न पडले तर नवलच.

sindhu durga
MH GovtMH GOVT
पर्यावरणाला कोणताही धक्का न लागता येथील वाहतूक व्यवस्था जपली आहे. फलोत्पादन, नर्सरी व्यवसाय व पर्यटन या माध्यमातून हा जिल्हा पर्यटकांचे स्वागत करतो.

कधी काळी मुंबईकडे पळणारा तरुणवर्ग आता सिंधुदुर्गातच व्यवसायाच्या संधी शोधतो आहे. पर्यटकांना आकर्षित करणार्‍या कित्येक बाबी आता सहज उपलब्ध झाल्याने निव्वळ मुंबईच्या मनिऑर्डरवर जगणारा जिल्हा म्हणून झालेली हेटाळणी दूर होऊन हा जिल्हा परकीय चलन मिळवून देण्यास सिद्ध झाला आहे. मग आता वाट कसली पाहता येवा सिंदुधुर्ग आपलाच असा.
आणखी
श्रीक्षेत्र श्री हरिहरेश्वर
आळंदीः ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ
त्र्यंबकेश्वर
घृश्णेश्वर
भीमाशंकर
श्री विघ्नहर