| | बासरी वाजविणे म्हणजे जीवांमध्ये प्राण फुंकण्यासारखे मानले जाते. त्यानंतर खाली वाकून परस्परांना अभिवादन केले जाते. मग सर्व समाजन आपल्या अंगातील काळे वस्त्र फेकून देतात. हे असत्याला त्यागून सत्याला प्राप्त करण्याचे प्रतीक मानले जाते. |
| |
शम्सच्या मृत्यूनंतर वेडेपिसे झालेल्या रूमी यांनी व्यथित होऊन एका खांबाला आपल्या उजव्या हाताने पकडून त्याच्या आजूबाजूला ते फिरू लागले. प्रेम आणि विरहाने ते गोल गोल फिरत राहिले. दुसर्या एका कथेनुसार, शम्सच्या मृत्यूनंतर एके दिवशी बाजारातून जात असताना रूमी यांनी हातोडीचा 'ठक ठक' असा आवाज ऐकला. या आवाजाने त्यांना संमोहित केले आणि ते उभे उभे गोल गोल फिरू लागले. ते सतत ४८ तास असे फिरत होते, अशी अख्यायिका आहे. अशा पद्धतीने सुरू झाली समाधीवस्थेला प्राप्त होण्याची सुफी परंपरा. पुढे रूमी यांच्या अनुयायांनी ही परंपरा पुढे नेली. १७ डिसेंबर १२७३ मध्ये रूमी परमेश्वराशी लीन झाले.
रूमी यांनी शोधून काढलेला नृत्यातून समाधी साधण्याचा विधी आता समजून घेऊया. या विधीला 'समा' असे म्हणतात. हा 'धिक्र' म्हणजे ईश्वराला भजण्याचा प्रकार आहे. त्यात भावनात्मकतेवर भर दिला जातो. मंत्रमुग्ध करणारे संगीत, अध्यात्मिक रूबाया व सतत ईश्वराचा जप व तालबद्ध गोल गोल फिरणे हे सगळे करणे म्हणजे 'समा' बांधणे. सगळे 'समाजन' एकत्र येऊन स्वतःला एका अध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवतात.
अल्लाह व पैगंबर साहेब वा त्यापूर्वी आलेल्या सर्व पैगंबरांप्रती नात-ए-शरीफची प्रस्तुती केल्यानंतर 'समा' बांधण्यास सुरवात होते. त्यानंतर होतो 'कदम'. त्यात ड्रमसारख्या वाद्याच्या ध्वनीवर पुढे येऊ लागतात. हा आवाज म्हणजे ईश्वराची हाक मानली जाते. त्यानंतर 'ने' वाजवली जाते. ही एक प्रकारची बासरी आहे. बासरी वाजविणे म्हणजे जीवांमध्ये प्राण फुंकण्यासारखे मानले जाते. त्यानंतर खाली वाकून परस्परांना अभिवादन केले जाते. मग सर्व समाजन आपल्या अंगातील काळे वस्त्र फेकून देतात. हे असत्याला त्यागून सत्याला प्राप्त करण्याचे प्रतीक मानले जाते. उंटाच्या केसांपासून बनलेली टोपी व पांढरे पायघोळ वस्त्र म्हणजे गर्वाची कबर आणि कफन यांचे प्रतीक असते. यानंतर समाजन आपले दोन्ही हात बांधून छातीवर ठेवतात. या अवस्थेत ते १ चे प्रतिनिधीत्व करून इश्वर एक आहे, हे सांगत असतात. त्यानंतर मग बाजूला उभ्या असलेल्या शेखची (गुरू) समामध्ये जाण्यासाठी अनुज्ञा मागतात. त्यानंतर मग ते गोल फिरणे सुरू करतात. हळू हळू ते हात उघडतात. उजवा हात वर नेऊन परमेश्वराशी आणि डावा हात खाली नेऊन धरतीशी संपर्काचा प्रयत्न करतात. उजवीकडून डावीकडे फिरत ते मनात अल्लाहचा नामजप करतात. संपूर्ण सृष्टी आपण कवेत घेतली असून प्रेमाचा प्रवाह आपल्यातून वाहतो आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण होते. गोल गोल फिरण्याची चार सत्रे असतात. ती पंधरा मिनिटे चालतात. याला चार सलाम असे म्हणतात. चौथ्या सलाममध्ये शेख म्हणजे गुरूही सामील होतात. कुराण पठणानंतर समा थांबवला जातो.
नीट पाहिलं तर या अध्यात्मिकतेही भौतिकावस्था दिसून येते. गोल गोल फिरण्याच्या या प्रकारात हे समाजन म्हणजे सूर्याभोवती म्हणजेच ईश्वराभोवती फिरणारे ग्रह वाटतात. परिवलन आणि परीभ्रमणाचाच आभास यातून होतो. थोडक्यात सत्यापर्यंत जाण्याचाच हा प्रयत्न वाटतो. संगीत व नृत्य या अवस्थेतून हे सत्य मिळविले जाते. आशुतोष गोवारीकरने हे नृत्य पडद्यावर दाखवून त्या प्राचीन परंपरेची ओळख नव्याने घडवून दिली आहे. |