ज्या सचिनच्या धडकीने उत्तर प्रदेशचा संघ मैदानावर उतरण्यापूर्वीच गारद झाल्याचे बोलले जात होते, त्या संघाने सचिनला अर्धातास खेळवत ठेवत एकही धाव न घेऊ देता शून्यावरच पव्हेलियनमध्ये पाठवले. सचिन, कर्णधार वसिम जाफर, सामंत, हे खेळाडू केवळ 55 धावांमध्ये गारद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि अभिषेक नायरच्या जोडगोळीने मुंबईचा डाव सावरल्याने उत्तर प्रदेशचे मनसुबे धुळीस मिसळले गेले.
मुंबईचा कर्णधार मैदानावर आल्यानंतर तो मैदान मारणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाच तो केवळ एक धाव घेत बाद झाला. यानंतर राहणे आणि सामंतही आल्यापावलीच परतल्याने मुंबईसंघ आणि चाहत्यांनी सचिनकडे नजरा लावल्या होत्या.
परंतु मास्टर ब्लास्टरची बॅट आज या मैदानावर एक धावही काढू शकली नाही. त्याला. भुवनेश्वर कुमारने बाद केले. सचिन बाद झाल्यानंतर भुवनेश्वराला अख्ख्या उत्तर प्रदेश संघाने डोक्यावर घेतले.
रोहित शर्मा आणि नायर ने केलेल्या भागीदारीने मुंबई संघाची लाज राखली. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबई 6 बाद 297 धावांवर खेळत आहे. |