कट टू टेक १.... बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाचे सीईओ चारू शर्मा आणि प्रशिक्षक वेंकटेश प्रसाद यांनी पदांचा राजीनामा दिला आहे. पराभव या संघाची पाठ सोडत नाहीये. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तगडे खेळाडू असूनही या संघाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. म्हणूनच शर्मा व प्रसाद यांची हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा आहे. कट टू टेक २.... हैदराबाद डेक्कन चार्जर्स संघात दिग्गज खेळाडू असतानाही हा संघ आतापर्यंत फक्त दोन विजय मिळवू शकला आहे. परवा मात्र, या संघाने आश्चर्यकारकरित्या आयपीएलमधील तगडा संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज या संघाला हरवून खळबळ माजवली. विशेष म्हणजे या संघात कर्णधार व्ही.व्ही.एस. लक्ष्मण नव्हता. त्याला मुद्दाम बसविण्यात आल्याचे कळते. कट टू टेक ३.... आयपीएल मोहालीच्या संघाने पराभवाची सलामी दिल्यामुळे चिडलेल्या प्रीती झिंटाने म्हणे सात खेळाडूंना फाईव्ह स्टार हॉटेलमधून सामान्य दर्जाच्या हॉटेलमध्ये हलवले.
कट टू फ्लॅशबॅक....
| | 'लिजंड' खेळाडू असल्याने लिलावात नसलेल्या राहूल द्रविड या एकमेव खेळाडूने या सगळ्या प्रकाराने हरखून न जाता एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, 'खेळाडूंना विकत घेणे योग्य नव्हे.'
|
| |
आयपीएल ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा तिचे कौतुक करताना अनेकांची तोंडे बेफाम सुटली होती. एरवी खोर्याने पैसा ओढणार्या भारतीय संघातील खेळाडूंनाही त्याचा मोह पडला, मग नवोदितांची काय कथा. सुरवातील संघाची फ्रॅंचाईझी विकत घेतली गेली. त्यासाठी शाहरूख खान, प्रीती झिंटासारखे खेळाडू तर उतरलेच पण कॉर्पोरेट कंपन्याही उतरल्या. ही सगळी तारकादळे आयपीएलच्या प्रांगणात उतरल्याने स्पर्धेला ग्लॅमरचा झगमगाट लाभला नसता तरच नवल. क्रिकेटपटूंची बोली लावली गेली तेव्हा तर 'कोटीच्या कोटी' उड्डाणांनी सामान्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. भारतीय खेळाडूंना तर लॉटरी लागल्यासारखेच वाटत होते. नवोदितही 'क्रिकेटचे उज्ज्वल करीयर' पाहून हरखून गेले होते.
क्रिकेटपटूंना 'विकत' घेण्यासाठी या कॉर्पोरेट कंपन्यात मोठी स्पर्धा लागली होती. आपल्याला हवे ते खेळाडू लिलाव करून त्यांनी विकत घेतले. त्यावेळी आपली बाजारातील किंमत पाहून या क्रिकेटपटूंनाही मूठभर मांस चढले होते. त्यावेळी 'लिजंड' खेळाडू असल्याने लिलावात नसलेल्या राहूल द्रविड या एकमेव खेळाडूने या सगळ्या प्रकाराने हरखून न जाता एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, 'खेळाडूंना विकत घेणे योग्य नव्हे.' कट टू टेक ४..... राहूलला या स्पर्धेचे भवितव्य, त्याचे होणारे परिणाम दिसले होते की काय कोण जाणे? पण त्याच्या या वाक्यातील गर्भित इशारा आज प्रत्यक्षात उतरला आहे. या स्पर्धेत उतरलेल्या कॉर्पोरेट कंपन्या क्रिकेटविषयी प्रेम आहे, म्हणून त्यात उतरलेल्या नाहीत. त्यांना यातून पैसा कमवायचा आहे. त्याच्यासाठी हा निखळ धंदा आहे. त्यांच्याकडे कोण क्रिकेटपटू आहे, त्याचे आतापर्यंतचे करीयर काय?, विक्रम काय? त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पत काय? याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नव्हते. त्यांना फक्त त्यांच्या संघाला जिंकून देण्याचे 'किलर इन्स्टिंक्ट' त्यांच्यात हवे होते. त्यांना पराभव नको होता. त्यांना तो सहन होणाराही नव्हता.
सुरवात प्रीती झिंटाने केली. सुरवातीच्या सामन्यात तिच्या पंजाब किंग्ज इलेव्हन संघाला विजयाचे तोंड पहायला मिळाले नव्हते. मग युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील संघाच्या काही खेळाडूंना तिने फाईव्ह स्टार हॉटेलमधून हलवून दुय्यम दर्जाच्या हॉटेलमध्ये हलवले. याचा संबंध कामगिरीशी जोडण्याची गरज नसल्याची सारवासारवही त्यावेळी करण्यात आली होती. पण त्यानंतर मात्र याचा परिणाम झाला की काय कोण जाणे पण हा संघ बर्यापैकी कामगिरी करतो आहे.
|