बांगलादेशात हिंदू असुरक्षित, २४ तासांत २ जणांची हत्या, महिलेवर सामूहिक बलात्कार
बांगलादेशात गेल्या २४ तासांत दोन हिंदूंची हत्या झाली. उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात आतापर्यंत सहा हिंदूंची हत्या झाली आहे. यापूर्वी एका हिंदू महिलेवर सामूहिक बलात्काराची घटनाही घडली होती.
जेसोर जिल्ह्यातील मोनिरामपूर येथील ४५ वर्षीय राणा प्रताप बैरागी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. राणा प्रताप बैरागी हे केशवपूर उपजिल्हातील अरुआ गावचे रहिवासी होते. सायंकाळी ५:४५ वाजता अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नरसिंगडी जिल्ह्यातील चारसिंदूर बाजारात किराणा दुकान चालवणाऱ्या मणी चक्रवती यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. हल्ल्याच्या वेळी ते दुकानात उपस्थित असल्याचे वृत्त आहे. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही.
बांगलादेशातील झेनाइदाह जिल्ह्यातील कालीगंज भागात ४४ वर्षीय हिंदू विधवेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर आरोपीने तिला झाडाला बांधून मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
३१ डिसेंबर रोजी बांगलादेशच्या शरीयतपूर जिल्ह्यात खोकॉन दास या हिंदू तरुणावर जमावाने हल्ला करून जिवंत जाळले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी, सोमवारी, बेजेंद्र बिस्वास या हिंदू तरुणाची त्याच्या सहकाऱ्याने गोळ्या घालून हत्या केली होती. २४ डिसेंबर रोजी बांगलादेशातील कालीमोहर युनियनमधील हुसेनडांगा भागात २९ वर्षीय अमृत मंडल या आणखी एका हिंदू तरुणाची जमावाने मारहाण करून हत्या केली होती. यापूर्वी दीपुचंद्र दासचीही हत्या करण्यात आली होती.
बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांबद्दल भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने अल्पसंख्याकांविरुद्ध सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल भारताच्या चिंता फेटाळून लावल्या आणि भारताचे विधान खोटे आणि दिशाभूल करणारे म्हटले.