शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

किल्ले रतनगड

प्रमोद मांडे

MHNEWS
सह्याद्रीचे रांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडाला भेट द्यावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले तालुका आहे. अहमदनगरच्या पश्चिम अंगाला हा तालुका आहे. अकोले तालुका डोंगरदर्‍यांनी अतिशय समृद्ध आहे. या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे.

रतनगडाचा किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे म्हणजे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर उठावलेला आहे. रतनगडाच्या उजवीकडे म्हणजे उत्तरबाजुला असलेला सुळका रतनगडाचा खुटा म्हणून ओळखला जातो. रतनगड आणि खुटा भंडारदरा धरणावरुन उत्तम दिसतात.

भंडारदर्‍याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या परिसरामधे येत असतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूर करीत नाही. इच्छा, शारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजना व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहील अशीच आहे.

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे. रतनगडाजवळ प्रवरानदी उगम पावते. या प्रवरानदीवर भंडारदरा धरण आहे. पुर्वी हे विल्सन डॅम म्हणून परिचित होते. या धरणाच्या पाण्याचा फुगवटा दोन बाजूंना पसरला आहे. एक फाटा समुद्रकडे जातो जर दुसरा फाटा रतनवाडीकडे जातो.

भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळ शेडी नावाचे गाव आहे. शेंडी गाव पर्यटनाच्या सोयीच्या दृष्टीने काहीसे विकसित झाल्यामुळे सध्या पर्यटकांची याला चांगलीच पसंती आहे.

मुंबई - आग्रा हा महामार्ग इगतपुरी कडून नाशिककडे जातो. या महामार्गावर इगतपुरीपासून १० किलोमीटर अंतरावर छोटी गाव आहे. छोटी ओलांडून पुढे गेल्यावर एक लहानशा खिंडीच्यापुढे उजवीकडे संगमनेरकडे गाडी वाट जाते. हीच वाट आपल्याला शेंडी गावात घेऊन जाते. या रस्त्यावर कळसूबाई शिखराच्या पायथ्याचे वारी गाव लागते. बारीच्या पुढे बाकी गावापासून शेंडीला जाता येते. इगतपूरी ते शेंडी साधारण ३५ कि.मी अंतर आहे.

पुणे-नाशिक या राज्यमार्गावर संगमनेर हे तालुक्याचे गाव आहे. संगमनेरमधून अकोले-राजूर-शेंडी असाही गाडीरस्ता आहे. शेंडी पासून रतनगडाकडे जाता येते. भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या फुगवटय़ाच्या कडेने गाडीरस्ता जातो. या मार्गाने फुगवटय़ाला पुर्ण वळसा मारता येतो. स्वत:चे वाहन असल्यास सोयीचे होऊ शकते. अथवा एस.टी.बसनेही पायथा गाठता येईल. मात्र अशा परिस्थितमध्ये किमान आठ ते दहा तास एवढा वेळ हाताशी असणे आवश्यक आहे.

भंडारदर्‍याच्या खोर्‍यात अखेरचे गाव घाटघर आहे. घाटघरला शेंडीपासून एस.टी.ची सोय आहे. घाटघर साधारण शेंडीपासून २६ कि.मी. आहे. त्याच्या अलिकडे ४ कि.मी.वर साम्रद्रचा फाटा आहे. फाटय़ापासून चालत साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद गावातून रतनगडाकडे जाणारी पायवाट आहे. साम्रद गावामधून वाटाडय़ा सोबतीला घेणे गरजेचे आहे. साम्रदमधून पाणी भरुन घ्यायला पाहीजे. पाणी व खाण्याचे पदार्थ तसेच वाटाडय़ाला घेवून रतनगडाकडे निघावे लागते.

साधारण दीड दोन तासात रतनगडच्या खुटय़ाला वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. डावीकडे खोल दरीतील बाणच्या मुळका आपले लक्षवेधून घेतो. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालत गेल्यावर पायर्‍या लागतात. या कातळकोरीव पायर्‍यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबक दरवाजा आहे. या दमछाक करणार्‍या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. या प्रवेशदारात पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. अर्थात देवडय़ा, दरवाजा आणि पायर्‍या या सर्व कातळात कोरुन तयार केलेल्या आहेत.

या अनामिक कारागिरांना आणि त्यांच्या कल्पकतेला दाद देतच आपण गडफेरीला सुरवात करतो. संपूर्णगड फेरी करण्यासाठी आपल्याला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. पावसाळ्यानंतर प्रचंड गवत वाढलेले असते. बर्‍याचदा ते डोक्यापेक्षाही उंच असते. त्यामुळे डिसेंबर नंतर गेल्यास या गवताचा फारसा त्रास होत नाही. रतनगडाच्या उत्तरभागातून कळसूबाईची रांग आपल्याला खिळवून ठेवते. कुलंग, मदन, अलंगडाबरोबर महाराष्ट्राचे उत्तुंग शिखर कळसूबाईचे दर्शन घेवून आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो. नेठे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेढे आहे. नेढय़ामधून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो. या नेढय़ातून भन्नाट वाहणार्‍या वार्‍याचा थरार अनुभवून आपण पुढे निघतो. येथे खालच्या बाजूला पाण्याची टाकी आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे.

गडाच्या पश्चिमकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात. त्याच्या उजवीकडे आजोबाचा विशाल पर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. याला राणीचा हुडा म्हणतात. इथे जवळच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. इथे एक नंदी आणि शिवलींग पहायला मिळते.

इथून जवळच गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे. जवळच कडय़ात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवी तांदळा आहे. कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे.

याच्या थोडे पुढे प्रशस्त गुहा आहे. जवळ पाण्याचे टाकेही आहे. ही जागा मुक्कामास योग्य आहे. येथून समोर भंडारदरा धरणाचा जलाशय, प्रवरा नदी, पाबरगड आणि महाराष्ट्रातील उंचीने दुसर्‍या क्रमांकचे पठार असलेले घनचक्करचे पठार उत्तम दिसते.

गडावर मुक्कामाचा बेत आणि नियोजन नसल्यास परतीचा प्रवास दुपारी ३ वाजे पुर्वी सुरु करावा म्हणजे अंधाराच्या आत खाली पोहोचता येते.

गणेश दरवाजातून शिडीच्या वाटेने खाली उतरावे लागते. या शिडय़ा अतिशय अवघड जागी बसवलेल्या आहेत. अतिशय धाडसाने व सावधानतेनेच हे दिव्य पार करावे लागते. कमकुवत मनाच्या लोकांना हे अवघड ठरु शकते. शिडय़ाउतरुन खालच्या पायवाटेने जंगलातून आपण दीड ते दोन तासामधे रतनवाडी मधे पोहोचतो.

रतनवाडीमधे एक अद्भुत मंदिर आपल्याला पहायला मिळते. १० व्या ११ व्या शतकामधे झांज राजांनी १२ नद्याच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळील अमृतेश्वर मंदिर.

अमृतेश्वर मंदिराच्या नुसत्या दर्शनानेही आपला दिवसभराचा थकवा दूर होतो. भुमिज पद्धतीचे हे मंदिर शिल्पकलेने नटलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाला दोन्ही बाजुला दरवाजे आहेत ही रचना वैशिष्ठ पुर्ण आहे.

येथून साम्रद साधारण ७ कि.मी. आहे तर शेंडी २० कि.मी. आहे. दुसर्‍या रतनवाडीस येवून तेथून पुढे लाँच चालू असल्यास लाँच ने मुरशेत अथवा शेंडीला येवून आपली भ्रमंतीची सांगता करता येवू शकते.