शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By मनोज पोलादे|

गोदा किनारी पक्षीनिरीक्षणाची पर्वणी

MH GovtMH GOVT
गोदावरीचा रम्य परिसर, हिरवीगार वनराई, दूरवर पसरलेले जलाशय आणि देशविदेशातील पक्षीनिरीक्षणाचा अभूतपूर्व आनंद. वर्णन ऐकल्यानंतर आपणास भरतपूरची आठवण येईल. मात्र महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून प्रसिद्ध असलेले नांदूर-मधमेश्वर अभयारण्य नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सुमारे १७६५ हेक्टर क्षेत्रात पसरले आहे.

पक्षीनिरीक्षकांसाठी हे नंदनवनच आहे. जैववैविध्यदृष्ट्या हा परिसर समृद्ध आहे. देशविदेशातील सुमारे दोनशे तीस पक्षांच्या जातींचे येथे वास्तव्य आहे. स्थलांतरित पक्षांच्या ऐंशी प्रजाती येथे आढळतात.

गोदावरी व कोडवा नदीचा परिस
MH GovtMH GOVT
वनस्पतींच्या वैविध्याने नटला आहे. यामध्ये दुर्मिळ वनस्पतींसहित तब्बल साडेचारशे वनस्पतीसोबतच ऐंशी पानवस्पतींचाही समावेश आहे. विधात्याने या परिसरात सृष्टीसौंदर्यासोबतच आध्यात्मितेचे सुरही गुंजत राहणार याची दखल घेतली आहे. परिसरातील मोठ्या संख्येत असलेल्या मंदिरांनी येथील सौंदर्यात आणखीनच भर घातली आहे. नदीच्या काठावरील मधमेश्वर मंदिराचा उल्लेख हिंदू पुराणातही आढळतो. भगवान रामाने याच ठिकाणी सुवर्णमृगाची शिकार केली होती, असे मानण्यात येते.

विधात्याच्या कवित्वाचा येथे साक्षात्कार घडल्याशिवाय राहत नाही. शहरातील दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यात गुंतून पडलेल्यांना येथे आल्यावर मनःशांती व आध्यात्मिक आनंदाची अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही. वनस्पतिशास्त्राचे अभ्यासक, पक्षी निरीक्षकांसाठी हा परिसर म्हणजे नैसर्गिक प्रयोगशाळात आहे. हिरवाईने नटलेल्या परिसरात आवश्यक साधने घेऊन मुक्तपणे भटकायचे, निसर्ग, वनस्पती व पक्ष्यांचे सौंदर्य कॅमेराबद्ध करायचे, दूरवर पसरलेल्या जलाशयावरून वाहणार्‍या आल्हाददायक थंड वार्‍याच्या लाटा अंगावर घ्यायच्या, झाडाखाली पहडून पक्षाच्या किलबिलाटात विश्रांती घ्यायची, हेही येथेच. गोदावरी नदीवर सुमारे 1907 ते 1913 दरम्यान नांदूर मधमेश्वर धरण बांधण्यात आले होते.

MH GovtMH GOVT
गोदावरीच्या या समृद्ध खोर्‍यात लहानमोठी तेवीस धरणे असल्यामुळे परिसरातील जमीन ओलिताखाली आली असून ऊस, भाजीपाला व फळांचे उत्पादन येथे घेण्यात येते. हौसी पर्यटकांना येथे निरनिराळ्या मत्स्यांची ओळखही करून घेता येईल. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान येथे पर्यटकांची रीघ लागलेली असते. येथील जंगलात मुक्त भटकंतीनंतर धरणाकाठी विश्रांतीचा अनुभवही सुखद असतो. धरणाच्या शांत पाण्याच्या कॅनव्हासवर येथील सुंदर भूभागाचे चित्र रेखाटल्या जाते. बस! हे विधात्याने रेखाटलेले चित्र डोळ्यात साठवायचे आणि घराकडे परतायचे नवीन उत्साह, आनंद, उमेद, जोश घेऊन....

जाण्याचा मार्ग : विमानाने यायचे झाल्यास औरंगाबाद हे जवळचे विमानतळ येथून पाऊणेदोनशे किमी. अंतरावर आहे. मुंबई येथून सव्वादोनशे किलोमीटरवर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास मुंबई-भुसावळ रेल्वेमार्गावर निफाड हे स्टेशन आहे. येथून 12 किलोमीटरवर अभयारण्याचा परिसर आहे. येथे पोहचण्यासाठी नाशिकहून बससेवाही उपलब्ध आहे.