गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : गुरूवार, 4 डिसेंबर 2014 (15:41 IST)

तानसा अभयारण्य

ठाणे जिल्ह्यात सुमारे तीनशे वीस किलोमीटरच्या विस्तीर्ण क्षेत्रात तानसा वन्यजीव अभयारण्य पसरले आहे. शहापूर, खर्डी, वैतरणा  तालुक्यातील वनश्रीने नटलेला हिरवागार परिसर व तानसा तळ्याच्या पाणलोट क्षेत्रातील हे अभयारण्य आवर्जून भेट देण्यासारखे आहे. 
 
दूरवर पसरलेल्या तानसा तळ्याचा जलाशय पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. जंगलातील विभिन्न वन्य जीवसृष्टीची तहान भागवण्याचे कामही हेच तळे करते. स्वप्नांची महानगरी मुंबईपासून दूर नसल्याने आठवड्यांच्या शेवटी निसर्गप्रेमींचे पावले इकडे आपोआप वळतात. तानसा अभयारण्याभोवतीचे जंगल कळंब, बांबू, खैर सारख्या वृक्षवल्लीने समृद्ध आहे. 
 
अभयारण्यातील नैसर्गिक वनसंपदेने नटलेले जंगल विविध पक्षांच्या प्रजाती व वन्यप्राण्यांसाठी उपयुक्त आहे. येथे प्राण्यांच्या ५४ तर पक्ष्यांच्या २०० प्रजाती आढळतात. घनदाट अरण्याने समृद्ध तानसा अभयारण्यात मुंबई, ठाणे व नजीकच्या भागातून पर्यटक व निसर्गप्रेमी आवर्जून भेट देतात. ठाणे व मुंबईस येथील तानसा व वैतरणा धरणातूनच पाणीपुरवठा होतो. 
 
निर्सगप्रेमी व पर्यटकांशिवाय ट्रेकर्सनाही येथील जंगल साद घालते. ऐतिहासिक माहूली किल्ला सर करताना ट्रेकर्सच्या साहसाची खरी कसोटी लागते. माहूलीच्या किल्ल्यात शहाजी राजे थांबले होते, असा इतिहास आहे. येथे प्राचीन महादेव मंदिरही आहे. त्याच्या मागे उंचावर पसरलेला सूर्यमाळचा भूप्रदेशही पर्यटकांना आकर्षित करतो. सूर्यमाळ हे मोखाडा तालुक्यात असलेले व खोडाळा या गावाजवळ असलेला गाव थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रिटिश काळात असलेला डाकबंगला येथे रहाण्याची सोय आहे. थंड हवेचे ठिकाण असले तरी त्याचे महाबळेश्वर झालेले नाही. व्यापारीकरणापासून ते मुक्त आहे. शिवाय अजूनही जंगल काही प्रमाणात शाबूत असल्याने शहरीकरणापासून अस्पर्शित आहे.
 
तानसा अभयारण्याला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते मे महिना उत्तम. येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी थांबायचे झाल्यास निवासाची व्यवस्थाही आहे. यासाठी उपवनसरंक्षक, ठाणे यांच्याशी संपर्क साधावा लागेल. 
 
कसे पोहचाल : विमान, रेल्वे व रस्ता मार्गाने येथे पोहचण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई विमानतळ येथून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे. अभयारण्यापासून अगदी तेरा किलोमीटरवर मध्य रेल्वे लाइनवर आटगाव स्टेशन आहे. खर्डीहूनही अभयारण्यात पोहचणे सहज आहे. मुंबईहून तानसा अभयारण्य सुमारे ९५ किलोमीटरवर असून मुंबई-आग्रा महामार्गावरील शहापूर शहरापासून येथे पोहचण्याची व्यवस्था आहे.