गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2016 (13:46 IST)

दाजीपूरची सफर

सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातील, पश्चिम घाटातील अभारण्ये, वन्यजीव नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. कोल्हापूरपासून 80 कि.मी. अंतरावर असलेले दाजीपूर अभयारण्य की जे जैव विविधतेचे हॉट स्पॉट किंवा रानगव्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्या ठिकाणी आमची सहल निघाली.
 
हे अभयारण्य रानगव्यांच्या भूमीबरोबरच विविध पक्षी आणि दुर्मिळ प्राण्यांच्या अधिवासाचे मूळ आहे. या अभयारण्यात 400 ते 500 गवे असून चित्ता, सांबर, मुंगूस, विविध सापांच्या जाती या ठिकाणी घर करून आहेत. जंगलामध्ये प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थ नेण्यास   परवानगी नसल्याने जंगलात जाण्यापूर्वी आम्ही खाद्यपदार्थ संपवले होते.
 
हुल्लडबाजी आणि दंगा केल्यास प्राणी बिथरतात आणि दूरवर पळतात. पर्यायाने एकही प्राणी दृष्टीस पडत नाही त्यामुळे शांतता आणि परस्पर सहकार्य ठेवत उत्तम निसर्ग सौंदर्यांचा आनंद घेत मार्गक्रमण करत होतो. बरोबर मार्गदर्शक घेतल्याने वाट चुकण्याची भीती नव्हती.
 
एका स्पॉटवर इतकी फुलपाखरे उडत होती की, ते एक आश्चर्यचच म्हणावे लागेल. जाता जाता हरळटोळ, लंगूर, ससे दृष्टीला पडले. घनदाट जंगल आणि किर्र करणारे किडय़ांचे आवाज वातावरणाची भाण शांतता छेदत होते. झुडपामध्ये काही वाजल्यास गव्याच्या भीतीने काळजाचा ठोका चुकत होता. काही अंतरावर रानकोंबडे दृष्टीला पडले. सायंकाळी साडेचारलाच काळोख पडू लागला.
 
जंगलात मध्येच एक कोकणदर्शन स्पॉट आहे. तेथे मोठमोठय़ा पर्वतरांगा आणि खोल दरी पाहून आश्चर्य वाटलं. जंगलात गारवा जाणवत होता. देवराई म्हणून राखून ठेवलेली जंगले आजतागात आपले अस्तित्व टिकवून असून इदरगंज पठार पावसाळ्यात रंगीबेरंगी फुलांनी बहरलेले असते. वर्षातील वेगवेगळ ऋतूंमध्ये विविधरंगी फुले इथे बहरतात.
 
अभयारण्य एकूण वीस कि.मी. आत असून घनदाट झाडामुळे कच्चा रस्ता आहे. रस्त्यामद्ये एकूण 3 वेगवेगळ ठिकाणी विशिष्ट अंतरावर टेहळणीसाठी मनोरे असून त्यावरून आजूबाजूचा परिसर, रम्य जंगल स्पष्ट दिसते. अभयारण्यातील दुर्मिळ वनस्पतींचा आयुर्वेदिक औषधांसाठी चांगला उपयोग होतो.
 
कच्चा रस्ता, मध्ये चढउतार आणि वारंवार बसणारे हादरे यामुळे थोडा त्रास झाला. निसर्गाचे संवर्धन, विकासातच देशाचा विकास दडला आहे. प्राण्यांची हत्या, शिकार, जंगलतोड थांबवून संवर्धन करण्याची गरज असल्याबद्दलचे विचार मार्गदर्शकानं आम्हाला सांगितले.
 म. अ. खडिलकर